
पंचनामा संपादकीय – महाराष्ट्रात सध्या गाव गावच्या ग्राम देवी देवतांच्या यात्रा जत्रा चालू झालेल्या असून चैत्र महिन्यात त्या जास्त प्रमाणात असतात. आता गाव पुढारी यात्रा जत्रांच्या नियोजनात दंग आहेत आपल्या यात्रा जत्रांची शोभा वाढवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सध्या सगळीकडेच डीजे लावणी शोचे जास्त प्रमाणात आयोजन केले जात असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर यांची वर्षानुवर्ष करमणूक करणारा व गावच्या यात्रा जत्रांची रंगत वाढवणारा लोकनाट्य तमाशा मात्र काही वर्षांपासून मागे पडला आहे. यामुळे तमाशा कलावंतांची हालाखीची परिस्थिती निर्माण होऊन तमाशा लोककला नामशेष होईल की काय हि भीती निर्माण झाली आहे. मात्र तमाशाला सावरण्यासाठी कोपरगाव तालुक्यातील अरुण खरात,बापूसाहेब गिरी, बाळासाहेब निकम, कैलास कोल्हे, भानुदास सोळसे, सोमनाथ पगारे, सचिन कोळपे, भाऊसाहेब शिरसाठ व इतर काही कलाप्रेमी मित्रमंडळी समोर आले असून ते सोशल मिडियाच्या माध्यमातून गाव गावचे सरपंच, पोलीस पाटील, यात्रा कमिटीतील पदाधिकारी यांच्याशी व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम व सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवरून संपर्क साधून त्यांना तमाशा कलेविषयी जनजागृती करून तसेच तमाशा पंढरी नारायणगाव, धुळे, काळज, घारगाव आणि समनापुर येथे लागलेल्या राहुठ्यातील म्हणजेच संपर्क कार्यालयातील तमाशा व्यवस्थापक व फड मालक यांचे संपर्क नंबर तसेच पोस्टर पाठवून तमाशा कलेचे आयोजन करण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राची तमाशा ही लोककला वाचवण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असून या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन या मोहिमेचे प्रमुख तमाशा लोककला व कलावंत अभ्यासक अरुण खरात यांनी केले आहे.


