
पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे
दत्तात्रयनगर,पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची सांडपाण्यावरून विनाकारण बदनामी केली जात असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ढगे म्हणाले की, कारखान्याचा मागील गाळप हगाम २०२५-२६ दि. २०.०२.२०२६ रोजी संपलेला असून ५ महिन्याचा कालावधी झालेला आहे. गळीत हंगाम कालावधीत कारखाना बंद झालेनंतर कारखान्यात कोणत्याही प्रकारचे सांडपाणी तयार होत नाही. त्यामुळे पुढील हंगामाची तयारी करण्याच्या दृष्टीने ऑफ सिझनमध्ये सांडपाण्याच्या तळ्यातील गाळ काढून तळ्याची साफसफाई करणे गरजेचे असते. त्याकरिता तळ्यातील गाळ काढण्याचे काम वर्क ऑर्डर नं. भीमाशंकर / सिव्हील / ३०३ / २०२६-२७ दि. २८.०४.२०२६ नुसार दिपक एकनाथ करंडे, रा. काठापूर बु., ता.आंबेगाव, जि. पुणे यांना दिलेले होते. ऑर्डरमधील अटी व शर्ती क्र. १६ नुसार करंडे यांना स्वत:चे टँकर व मजूराकरवी तळ्यातील गाळ भरून कारखान्यातील अधिकारी सांगतील त्या ठिकाणी नेवून टाकण्यासाठीच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या होत्या.
परंतु करंडे यांनी तळ्यातील गाळ टँकरमध्ये भरणेऐवजी व कोणत्याही अधिका-यांची पूर्व परवानगी न घेता दि. ०३.०८.२०२६ रोजी रात्री ९ वाजताचे सुमारास तळ्याच्या तळाला असलेल्या गाळात पाणी सोडून, पातळ करून गाळ मिश्रित पाणी पंपाद्वारे तळ्याबाहेर सोडून दिले होते.
करंडे यांच्या परस्पर गाळ मिश्रित पाणी बाहेर सोडण्याच्या कृतीमुळे कारखान्यातून प्रदूषित पाणी बाहेर सोडल्याचे विनाकारण आरोप करून कारखान्याची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
कारखान्यामार्फत प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक ती सर्व प्रकारची यंत्रणा बसविलेली असून संपूर्ण यंत्रणा योग्य पद्धतीने कार्यरत आहे. कारखान्याने अतिशय चांगल्या पद्धतीने उपाययोजना करून सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुर्नवापर केला आहे. स्थानिक नागरीकांना कुठलाही त्रास होणार नाही यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला जात आहे व यापुढेही नेहमीच स्थानिक नागरिकांचे आरोग्याच्या दृष्टीने अधिकाधिक जबाबदारीपूर्वक प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहोत.
कारखाना सभासद शेतक-यांचाच असून त्यामध्ये शेतक-यांच्याच ऊसाचे जास्तीत जास्त कार्यक्षमतेने गाळप करून, शेतक-यांना जास्तीत जास्त बाजारभाव देण्याचा प्रयत्न राहिला आहे व यापुढेही राहील. कारखान्यावर परिसरातील अनेक शेतकरी कुटूंबे व नागरिक अवलंबून असून कारखान्यामुळे परीसराचा आर्थिक विकास होवून नागरिकांचे जीवनमान उंचावलेले आहे. त्यामुळे कारखान्याची विनाकारण बदनामी करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
