
पंचनामा विशेष – मा.निलेश आहिरेकर व रुपाली पुणेकर या तमाशा फडामध्ये एक दिवस मी मुक्कामाला होतो. यात्रेत छबिण्याचा कार्यक्रम संपून रात्री दीड वाजता कार्यक्रम चालू झाला.पहाटे चार वाजता सुटला.दुसऱ्या दिवशी हजेरी करून तमाशाच्या गाड्या अकोला येथे देवठाणकडे गेल्या.इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे ते देवठाण किमान २५० किलोमीटरच्या पुढे अंतर आहे.
कलावंतांना केवढी मोठी दगदग फडाचा किती खर्च किती मोठा इंधनावर…एवढा प्रवास करून परत संध्याकाळी कार्यक्रमासाठी उभे राहायचे.जरी प्रवासाची कलावंतांना सवय असली तरी शरीर हे हाडामांसाचे ,रक्ताचेच आहे. त्यांना देखील त्रास होणार.
बारामती येथे नुकतेच विकास पिंपरीकर यांचे निधन झाले
त्यांच्या कुटुंबातील सर्व तमाशा फडातील कलावंत जशी वेळ मिळेल तसे येऊन कोणी अंत्यविधीला आले ,कोणी सावडण्यासाठी आले, कोणी दहाव्याला येऊन, दुःख करून,घेऊन परत कार्यक्रमासाठी गेले. यामध्ये चुलते होते ,चुलत भाऊ होते ,बहिणी होत्या मेहुणे ,चुलत बहिणी होत्या, आत्या ,मामा होते,अन्य नातेवाईक होते.
सीझन सुरू असल्यानंतर कलावंतांना दुःख करण्यासाठी सुद्धा वेळ नाही , डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी सुद्धा वेळ नाही, दुःख एवढे मोठे असते की, ते सहन होत नाही, यात्रा कमिटीला सांगता येत नाही. कार्यक्रमाला वेळेवर गेले नाही तर ,रोष घ्यावा लागतो.जर कार्यक्रम नाही केला तर, फडाला आर्थिक तोटा सहन करावा लागतो.
कलावंतांचे, रसिक ,रंगमंचाशी नाते
रोजच दुःख,त्रासाला सोसावे लागते
कला जीवनाला चाक व दु:ख बांधून गावोगावी सतत फिरावे लागते.
कलावंत आजारी असल्यावर सुद्धा कार्यक्रमासाठी उभे राहावे लागते .गुडघा दुखतो ,पाय दुखतो अंग दुखते या सबबी चालत नाहीत.
रंगमंचावर सर्व विसरून काम करावेच लागते.
महाराष्ट्रात यात्रांचा सीझन सुरू असून अनेक तमाशा फड सतत इकडून तिकडे फिरत आहेत.
कडक उन्ह,वादळ ,वारा ,पाऊस झेलत आहेत. तमाशाकलेसाठी स्वतःच्या व कुटुंबाच्या पोटासाठी.
कलाक्षेत्रातील सर्वजन फिरत आहेत.
रसिकांनी फडमालक व कलावंतांची व फडावर अवलंबून असणारे सर्वजण यांची कदर केली पाहिजे.त्यांना योग्य ते सहकार्य केले पाहिजे.कार्यक्रमात गोंधळ हुल्लडबाजी,राग ,द्वेष ,वैर सोडून दिले पाहिजे. कार्यक्रम शांततेत व चांगला कसा होईल सर्वांनी पाहिले पाहिजे. काही गावामध्ये अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम होतो.यात्रा कमिटी मोठ्या प्रमाणावर सहकार्य करते. कलावंतांना खूप बरे वाटते.
रसिकराज तुम्हीच बना मायेचा आधार,कला, कलावंतांना साथ द्या !!
८० वर्षाचे जेष्ठ वगनाट्ये कलावंत राज्य शासन पुरस्कार प्राप्त मा.आवळेमास्तर यांच्या कलेस लेख अर्पण…
राजेंद्र डी.मोरे ,बारामती


