
पंचनामा प्रतिनिधी – श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारचे औचित्य साधून जारकरवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी भाविकांसाठी फराळ वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे मंदिर परिसरात भक्तिमय व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

धार्मिक परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जारकरवाडी गावाची ओळख निसर्गसौंदर्याने नटलेले गाव म्हणून आहे. गावातील प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात व मंदिरात पांडवकालीन लेणी असून, या लेण्यांना ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

इतिहासातील उल्लेखानुसार पांडवांनी या परिसरात काही काळ वास्तव्य केले होते. तसेच या लेण्यांमध्ये पांडवांनी शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याची आख्यायिका व ऐतिहासिक उल्लेख आहे.

गावाच्या पूर्व भागात मोहेंजोदारो पद्धतीच्या रचनेची आठवण करून देणारे उत्खननातील अर्धवट बांधकाम देखील पाहावयास मिळते. त्यामुळे जारकरवाडीचा ऐतिहासिक वारसा अधिक वैशिष्ट्यपूर्ण ठरतो.

धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाबरोबरच जारकरवाडी गाव कृषी क्षेत्रातही समृद्ध आहे. गावाला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याचे बारमाही पाणी उपलब्ध असल्याने परिसरातील शेतीला मोठा फायदा झाला आहे. ऊस, कोबी, फ्लॉवर, बीट, टोमॅटो आदी नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. त्यामुळे गावातील शेतकरी आधुनिक व व्यावसायिक शेतीकडे वळलेले दिसून येतात.

जारकरवाडीतील धार्मिक उत्सवांनाही विशेष महत्त्व आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात बिरोबा महाराजांचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी पारंपरिक बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम हा या उत्सवाचे प्रमुख धार्मिक आकर्षण असते.

गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सप्ताहाचेही मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येते. नवरात्रोत्सव व सप्ताह काळात सर्व ग्रामस्थांना अन्नप्रसादाचे वाटप करून सामाजिक एकोपा आणि धार्मिक परंपरा जपल्या जातात. गावचे ग्रामदैवत आई वडजादेवी यांच्या यात्रा उत्सवाचेही दरवर्षी मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते.

धार्मिक श्रद्धा, ऐतिहासिक वारसा, निसर्गसौंदर्य आणि कृषी समृद्धी यांचा सुंदर संगम असलेल्या जारकरवाडी गावाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. श्रावणी सोमवारनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या फराळ वाटपाच्या उपक्रमामुळे गावातील सामाजिक व धार्मिक एकोप्याचे दर्शन घडले.

विठ्ठल रुक्मिणी प्रतिष्ठान या प्रतिष्ठानची स्थापना सन 2020 मध्ये करण्यात आली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येते. अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली.

प्रतिष्ठानचे मार्गदर्शक बाळासाहेब दुलबा भोजने, अशोक नामदेव भोजने (अध्यक्ष) दगडू महादेव देवडे (उपाध्यक्ष) सभासद पंढरीनाथ सुखदेव काकडे, सुखदेव भिका भांड, कचर दगडू लबडे, अनिल शेठ महादू लबडे, कचरदास दगडू भोजने, खंडू शेठ गेनभाऊ भोजने, शरद विठ्ठल भोजने, नवनाथ भिकन मंचरे, गणेश भाऊ भोजने, रमेश गंगाधर पाचपुते, अशोक राघू देवडे, शिवाजी गेनभाऊ भोजने,डॉ.महादू धोंडीबा भोजने, कोंडीबा दिगंबर भोजने, जयवंत शंकर वनवे, गुलाब बाळकु वनवे, पोपट रंगनाथ लोले,मनाजी यमनाजी भांड, विलास जालिंदर लबडे, प्रशांत रमेश लबडे, रमेश किसन भांड, ज्ञानेश्वर भाऊ लबडे व समस्त ग्रामस्थ जारकरवाडी यांच्यावतीने फराळ वाटपाचे नियोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोपान पाबळे यांनी केले






