
पंचनामा प्रतिनिधी – यंदा सुरवातीला चांगला पाऊस झाल्याने आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात शिरदाळे, धामणी, लोणी, पहाडदरा, मांदळवाडी, वडगावपीर परिसरात 100%पेरण्या झाल्या होत्या. त्यामुळे यंदा चांगली पिके येऊन शेतकरी समाधानी होईल अशी अपेक्षा होती परंतु गेल्या पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे सर्वच पिके धोक्यात आली आहेत. पावसाची एवढी ओढ आहे कि रानातील जाणवरांचा चारा देखील वाळला असून त्यामुळे दुबती जाणवरे देखील दुधाला कमी झाली आहेत. त्यामुळे शेतकरी आणि दूध व्यवसायिक शेतकरी अडचणीत सापडला आहे असे माऊली डेअरीचे चेअरमन अनिकेत चौधरी, भूपेंद्र तांबे, शुभम तांबे तर अमुल डेअरीचे चेअरमन संतोष तांबे, निवृत्ती तांबे यांनी सांगितले.
सुरवातीला बटाटा पिकाचे आगार असलेले शिरदाळे गाव बटाटा लागावाडीत 10 ते 15% वर आले आहे. त्यामुळे सोयाबीन या पिकाकडे सर्वांचाच कल गेला आहे. परंतु यंदा पावसाने खूप मोठी उघडीप दिल्याने सोयाबीन सह बटाटा, वाटाणा, मूग, उडीद सह इतर पिके जमीनदोस्त होण्याच्या मार्गांवर आहेत. सर्वच पिके आता ऐन उमेदीत होती. काहींना फळ यायचा तर काहींना फुलांचा बहर होता परंतु पाऊस लांबल्याने आजच पिके 50% गेल्यात जमा आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत पाऊस पडला नाही तर सर्व पिके जळून खाक होतील आणि मोठं संकट शेतकऱ्याच्या समोर उभे राहील असे प्रगतशील शेतकरी बाबाजी चौधरी, कांताराम तांबे, निवृत्ती मिंडे, राघू रणपिसे, केरभाऊ तांबे,संभाजी सरडे, संदीप मिंडे, मारुती तांबे, गोरक्ष तांबे या शेतकऱ्यांनी सांगितले.
शिरदाळे परिसराची शेती ही पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे.त्यामुळे पावसाचे कमी जास्त प्रमाण हे कायमच शेतकऱ्यांना चिंतेत टाकत असते. यंदा देखील सुरवातीला चांगला झालेला पाऊस आता पंधरा ते तीन हप्त्यापासून पडलेला नाही त्यामुळे शेतीबरोबरच जाणवरांचा चारा देखील वाळला आहे. पावसाची नितांत गरज असून पाऊस पडला नाही तर संपूर्ण खरीप हंगाम वाया जाईल आणि काही क्षेत्रावर झालेली ज्वारीची पेरणी वाया जाऊन त्यावर दुबार पेरणीचे संकट उभे राहील.
श्री. मयूर सरडे (मा. उपसरपंच , शेतकरी शिरदाळे, )




