
पंचनामा पेठ प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार परिसरात बटाटा पिकाची काढणी सध्या प्रगतीपथावर आहे. बटाट्याला सध्या अपेक्षित असा बाजारभाव मिळत नसला, तरी उत्पादन चांगले निघाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
योग्य हवामान, वेळेवर सिंचन व संतुलित खत व्यवस्थापनामुळे यंदा बटाटा उत्पादनात वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

भावडी येथील शेतकरी विनायक चक्कर यांनी एका एकर क्षेत्रावर बटाट्याची लागवड केली होती. त्यांनी २५०० रुपये प्रति क्विंटल दराने बियाणे खरेदी केले. बियाणे, मजुरी, औषधे, रासायनिक खते व कोंबड खत यांचा मिळून अंदाजे ४५ ते ५० हजार रुपये एकरी खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. एका बटाटा बियाण्याच्या ५० किलोच्या प्रिशवीतून सुमारे ९०० किलो बटाटा उत्पादन निघाल्याचा दावा त्यांनी केला आहे. सध्या बटाट्याला पंधरा रुपये प्रति किलो असा बाजारभाव मिळत असून विक्री थेट बांधावर झाली आहे. १८० बॅग बटाटा पिशवीचे उत्पादन निघाले आहे. एकरी सुमारे ५० हजार रुपये खर्च वजा जाता तब्बल ९० हजार रुपयांचा नफा मिळाल्याचे चक्कर यांनी सांगितले.

बाजारभाव २० ते २५ रुपये प्रति किलो असता, एकरी दीड लाख रुपयांपर्यंत नफा मिळाला असता, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. मे ते ऑक्टोबर अखेरपर्यंत पाऊस झाल्यामुळे बटाटा लागवडीचे काढणीचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. त्यामुळे बटाटा काढणे उशिरा आणि अनियमित सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

