
पंचनामा प्रतिनिधी – आज राष्ट्र उभारणीच्या कार्यात शिक्षकांचा मोलाचा हातभार आहे.एक चांगला शिक्षक आणि सुसंस्कृत पिढ्या घडवतो.तंत्रज्ञानाचा योग्य वापर,चिकित्सक विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकांनी घेतलेले परिश्रम कौतुकास्पद असून, अशा शिक्षकांच्या कार्यामुळे आंबेगाव व शिरूर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राला नवी ओळख मिळत आहे. ”असे प्रतिपादन मा.सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी केले.

अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथील इंजिनिअरींग कॉलेजच्या कवयित्री शांता शेळके सभागृहात भीमाशंकर सहकारी साखर कारखाना लि.पारगाव आणि पंचायत समिती आंबेगाव व शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन सन्मान सोहळा कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात वळसे पाटील बोलत होते.

पुढे ते म्हणाले,“ज्ञान,संस्कार आणि मुल्यांची शिदोरी देऊन नवी पिढी घडवणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणे हा नेहमीच एक विशेष आणि अभिमानास्पद क्षण असतो.आंबेगाव आणि शिरूर तालुक्याच्या वैभवात आपल्या सर्व शिक्षकांचे योगदान अतिशय मोलाचे आहे.शिक्षकांचा सन्मान म्हणजे त्यांनी समाजासाठी दिलेल्या निरपेक्ष सेवेचा आणि निष्ठेचा केलेला यथोचित गौरव आहे.

यावेळी इस्रो, नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीच्या निवड परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या आंबेगाव व शिरूर तालुक्यातील १४ गुणवंत शिक्षकांचा यावेळी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यात आंबेगाव तालुक्यातील पदवीधर शिक्षिका कमल संतोष थोरात, हेमराज भदाणे आणि संदीप शिंदे (थोरांदळे शाळा),रोहिदास सोनवणे (चांडोली बुद्रुक शाळा), अशोक मावळे (वळती शाळा), सुदर्शन रासकर (जारकरवाडी शाळा),प्रमिला जोरी, किसन शिंगाडे आणि कविता वळसे (मोरडेवाडी शाळा),सरला खराडे आणि निर्मला सोमवंशी (गावडेवाडी शाळा), गुलाब थोरात (साकोरे शाळा) तसेच शिरूर तालुक्यातील सुनील पलांडे व गीतांजली वाघोले (पिंपळे खालसा शाळा) यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी शिक्षकांशी संवाद साधताना म्हणाले, “ रस्ते,इमारती,भौतिक सुविधा विकास घडवतात पण शिक्षकांच्या विचारांना मिळालेली दिशा भविष्यातील पिढी घडवते.शिक्षकांना सन्मानित करून त्यांच्या विचारांना समृद्ध करणे,नवी दृष्टी देणे आणि ज्ञानाच्या नव्या वाटा दाखवणे हा दृष्टीकोन अत्यंत कौतुकास्पद आहे.”

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असलेली वैज्ञानिक जिज्ञासा, गुणवत्ता आणि आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्ने ओळखून त्यांना योग्य मार्गदर्शन देणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागील शिक्षकांच्या योगदानाची दखल घेत झालेला हा सन्मान शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला.

याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,जिल्हा परिषद सदस्य विष्णुकाका हिंगे,आंबेगाव पंचायत समिती सभापती कैलासबुवा काळे,उपसभापती ज्योती पारधी, आंबेगावच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,शिरूरचे गटविकास अधिकारी महेश डोके, गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका,पंचायत समिती सदस्या उषाताई कानडे,अंकिता वाळुंज, निलेश टेमकर,शिवाजी निघोट,निलेश स्वामी थोरात,दिनेश खेडकर,शिक्षक संघटनेचे सचिन तोडकर,महेश बढे,विजय वळसे,सुनिल भेके यांच्यासह आंबेगाव व शिरूर तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक उपस्थित होते.सभापती कैलासबुवा काळे,माजी आमदार पोपटराव गावडे,शरद अभंग यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

सूत्रसंचालन निलेश पडवळ,प्रास्ताविक प्राचार्य सुनिल वळसे आणि आभार केंद्रप्रमुख राजू जाधव यांनी मानले.

अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) येथे शिक्षक दिन सोहळ्यात आंबेगाव व शिरूर तालुक्यातील पुरस्कार प्राप्त गुणवंत शिक्षक.
