
पंचनामा प्रतिनिधी – डिजिटल युगात फोटो, प्रिंटिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हाताने चित्रे काढण्याच्या पारंपरिक कलेला मोठा फटका बसला आहे. पूर्वी भिंती,फलक आणि घरातील सजावटीसाठी चित्रकारांकडून पेंटिंग करून घेण्याची मोठी मागणी होती.मात्र, डिजिटल प्रिंटिंगच्या वाढत्या वापरामुळे या पारंपरिक कलेचे महत्त्व कमी होत चालले आहे. असे असले तरी हाताने साकारलेल्या चित्रातील कलात्मकता आणि जिवंतपणा आजही अनेकांना आकर्षित करत आहे.

पारगाव येथील चिचगाई मळ्यातील सिताराम महिपत ढोबळे यांच्या निवासस्थानी चित्रकार संदीप क्षिरसागर व सचिन शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र साकारून पूर्णत्वास नेले. हाताने रंग आणि कुंचल्याच्या माध्यमातून साकारलेल्या या तैलचित्रामुळे पारंपरिक चित्रकलेचे वेगळेपण अधोरेखित झाले.
तैलचित्राचे काम पूर्ण झाल्यानंतर माजी उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे यांनी चित्रकार संदीप क्षिरसागर व सचिन शिंदे यांचा शाल, श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी चित्रकार संदीप क्षिरसागर यांनी, “मी सन १९९६ पासून पेंटिंग व्यवसाय करत असून बदलत्या काळात या व्यवसायाच्या स्वरूपात मोठे बदल झाले आहेत,” असे सांगितले. डिजिटल प्रिंटिंग आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे पारंपरिक पेंटिंग व्यवसायासमोरील आव्हाने वाढली असली,तरी हाताने साकारलेल्या चित्रकलेला असलेले कलात्मक मूल्य आजही कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ॲड अशोक ढोबळे, मिराबाई ढोबळे,सुनील ढोबळे, अनिष ढोबळे,जीवन ढोबळे,कु.राजनंदिनी विठ्ठल ढोबळे,आगंद पोंदे आदी उपस्थित होते.




