
पंचनामा प्रतिनिधी – शेकडो वर्षांचा वैभवशाली इतिहास, समृद्ध परंपरा, संस्कार, संस्कृती आणि माणुसकीचा त्रिवेणी संगम असलेल्या धामणी गावात यंदा श्रीकृष्ण जन्माष्टमी हरिनाम सप्ताहाचा शताब्दी सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा होत आहे. श्रद्धा, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा हा सोहळा गावाच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा ठरत आहे.
गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे यांच्या आशीर्वादाने तसेच मठाधिपती ह.भ.प. विष्णू महाराज केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शताब्दी सोहळ्याचा हा भक्तिरूपी जगन्नाथाचा रथ समस्त धामणी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढे चालविला आहे. ही श्रद्धा आणि एकोप्याची परंपरा पुढील पिढीपर्यंत रुजविण्यासाठी गावकरी अपार मेहनत घेत आहेत.
शताब्दी सोहळ्यातील नामसंकीर्तनाचे पहिले पुष्प शनिवार, दि. २९ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील प्रख्यात युवा कीर्तनकार ह.भ.प. प्रकाश महाराज साठे यांनी आपल्या प्रभावी कीर्तनसेवेतून गुंफले. श्रद्धा, भक्तिभाव, नामसंकीर्तन, संत परंपरा, संस्कृती आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांना केंद्रस्थानी ठेवून सादर करण्यात आलेल्या त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविकांची मने जिंकली.
या सोहळ्यास अबालवृद्धांसह हजारो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत भक्तिरसाचा आनंद घेतला. परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. सोहळ्यातील सुसज्ज व अचूक नियोजन, भाविकांसाठी करण्यात आलेली व्यवस्था, अन्नदान आणि सेवाभाव यामुळे धामणी गावाच्या संघटनशक्तीचे दर्शन घडले.
गावकऱ्यांचा दानशूरपणा आणि प्रत्येकाच्या सहभागातून उभा राहिलेला हा सोहळा इतर गावांसाठीही आदर्शवत ठरत आहे. कोणत्याही मोठ्या इव्हेंट मॅनेजमेंटला लाजवेल असे काटेकोर नियोजन आणि ग्रामस्थांची एकजूट हे धामणी गावाचे खास वैशिष्ट्य असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
“अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग” या संतवचनाचा प्रत्यय देणारा हा शताब्दी सोहळा दिवसेंदिवस अधिक भक्तिमय आणि उत्साहपूर्ण होत असून, आगामी दिवसांत या सोहळ्याची रंगत आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे.




