
उत्पन्नाचे प्रमुख साधन धोक्यात; नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी !!
पंचनामा प्रतिनिधी शिरदाळे – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे परिसरात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने पावसाळी बटाटा पिकाला मोठा फटका बसला आहे. पाण्याअभावी शेतातील बटाट्याची पाने सुकून करपू लागल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असून, बटाटा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
शिरदाळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वी पावसाळी बटाटा पिकाची लागवड केली होती. यंदा पावसाचे आगमन उशिरा झाल्याने सुरुवातीला लागवडीवर परिणाम झाला. त्यानंतर झालेल्या पावसामुळे पिकाची वाढ चांगली झाली होती. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे ओढ दिल्याने बटाटा पिकाला आवश्यक पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे.
शिरदाळे परिसर डोंगर-पठार भागात असल्याने येथील बहुतांश शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे पावसाने दडी मारल्यास खरीप पिकांसह बटाटा पिकावरही त्याचा थेट परिणाम होतो. सध्या अनेक शेतांमध्ये बटाट्याची पाने सुकून करपू लागली आहेत. परिणामी पिकाच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
बटाटा हे या परिसरातील शेतकऱ्यांच्या वर्षभरातील महत्त्वाच्या उत्पन्नाचे साधन आहे. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीसाठी मोठा खर्च केल्यानंतर पावसाअभावी पीक धोक्यात आल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महसूल व कृषी विभागाने शिरदाळे परिसरातील बटाटा पिकाची तातडीने पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने नुकसानभरपाई व मदत मिळवून द्यावी, अशी मागणी बटाटा उत्पादक शेतकरी बाबाजी चौधरी, राघू रनपिसे, सचिन तांबे, संदीप मिंडे आणि सिद्धार्थ तांबे यांनी केली आहे.


