
मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे सलग दोन दिवस वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेषतः जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून, भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास पाबळ उपविज केंद्रावर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मांदळेवाडी गावाला शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथून वीजपुरवठा केला जातो. हा पुरवठा कान्हूर मेसाई उपकेंद्रामार्गे ढगेवाडी होत मांदळेवाडीपर्यंत पोहोचतो. बुधवारी (दि. ६) सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने सिमेंटच्या विद्युत खांबाला धडक दिल्याने खांब कोसळला आणि गावाचा वीजपुरवठा खंडित झाला.
ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि स्थानिकांच्या मदतीने संबंधित विद्युत खांब उभा करण्यात आला.

त्यानंतर गुरुवारी (दि. ७) दुपारी सुमारे तीन वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. मात्र, या काळात कोणत्याही लोकप्रतिनिधी किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांनी मदत न केल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.
तसेच, शिरूर तालुक्यातील वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे दुरुस्तीचे काम वेळेत झाले नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. “आता येईल, मग येईल” असे सांगत दोन दिवस ग्रामस्थांना प्रतीक्षा करावी लागल्याने जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अज्ञात वाहन चालकाने खांबाला धडक दिल्यानंतर महावितरणकडून संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

दरम्यान, शिरूर तालुक्यातून आंबेगाव तालुक्यातील मांदळेवाडी, ढगेवाडी आणि कान्हूर मेसाई या भागांना वीजपुरवठा केला जातो. मात्र, इतर गावांच्या तुलनेत मांदळेवाडीत वारंवार वीज खंडित होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. शिवाय, गावात दररोज सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत भारनियमन होत असून, त्यामध्ये कोणताही बदल केला जात नसल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.
यापुढे वीजपुरवठ्याबाबत ग्रामस्थांना त्रास झाल्यास पाबळ उपविज केंद्रावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा सरपंच उज्वला आदक, उपसरपंच रवि ढगे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुनील आदक आणि ग्रामस्थांनी दिला आहे.
