
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल येथे सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण – गौरव सोहळा उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा गौरव करण्यासाठी आयोजित या सोहळ्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि उपस्थित मान्यवरांसाठी अविस्मरणीय क्षण निर्माण केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून समर्थ गुरुकुलच्या माजी प्राचार्या सौ. अन्नपूर्णा राव उपस्थित होत्या. यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या स्नेहलताई शेळके, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, समर्थ गुरुकुलचे प्राचार्य सतीश कुऱ्हे, क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे तसेच सखाराम मातेले यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना सौ. अन्नपूर्णा राव म्हणाल्या, “जीवनातील प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्टतेचा ध्यास, सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिस्त यांच्या बळावरच यश संपादन करता येते.” विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी चिकाटी, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड दिल्यास यश निश्चित मिळते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांना भविष्यात अधिक उंच भरारी घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनी मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करून त्यांच्या क्षमतांना योग्य दिशा देण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाला पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. अनेक विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त करत समर्थ गुरुकुलने दिलेले दर्जेदार शिक्षण, विद्यार्थीकेंद्रित अध्यापन, संस्कारक्षम वातावरण आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा आनंद, पालकांच्या डोळ्यांतील समाधान आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील अभिमान यामुळे संपूर्ण परिसर प्रेरणादायी वातावरणाने भारावून गेला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असलेल्या समर्थ गुरुकुलने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची समृद्ध परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे नियोजन वर्गशिक्षिका प्रिया कडूसकर व सुकन्या हिंगे, वैशाली सहाणे, स्नेहल ढोले यांनी उत्कृष्टरीत्या केले. सूत्रसंचालन रामचंद्र मते यांनी प्रभावीपणे केले, तर दीपाली नवले यांनी उपस्थित मान्यवर, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.



