
पंचनामा प्रतिनिधी – राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजासह सामान्य नागरिक चिंतेत आहेत. मान्सूनची प्रगती हर्णे-सोलापूर बेल्टपाशी रेंगाळली असून, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यात तब्बल ६९% पावसाची तूट नोंदवली गेली आहे.
पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा उन्हाचा चटका आणि दमटपणा वाढला आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार, याबाबतचा ताजा अंदाज वर्तवला आहे.
२५ जूननंतरच मान्सून पकडणार गती – हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सध्या मान्सूनचा प्रवास संथ असला तरी १८ जूनपासून त्याची हालचाल हळूहळू सुरू होईल. मात्र, राज्यात खऱ्या अर्थाने मुसळधार पावसाची सुरुवात २५ जून ते २ जुलै या कालावधीत होण्याची शक्यता आहे. या काळात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल आणि बहुतांश भागांत चांगला पाऊस पडेल.
१८ ते २५ जून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर (ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग) पावसाचा जोर हळूहळू वाढेल.२५ जूननंतर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांत मान्सून सक्रिय होऊन दमदार पावसाला सुरुवात होईल.
पुढील ४८ तास -उष्णतेची लाट आणि दमट हवामान – पावसाचा जोर वाढण्यापूर्वी, म्हणजेच पुढील ४८ तासांत राज्याला दुहेरी हवामानाचा सामना करावा लागणार आहे.
मराठवाडा व विदर्भ – पुढील दोन दिवस काही जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) इशारा देण्यात आला आहे.
मुंबई व कोकण – पाऊस नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाडा आणि दमट (Humid) हवामानाचा त्रास सहन करावा लागेल.
वादळी पाऊस – दुपारनंतर किंवा संध्याकाळी काही ठिकाणी स्थानिक ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ४०-५० किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा सल्ला- पावसाने ओढ दिल्यामुळे कृषी तज्ज्ञांनी आणि हवामान विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरण्या न करण्याचे आवाहन केले आहे.





