
पंचनामा प्रतिनिधी – ऑगस्ट महिन्यानंतर आता सप्टेंबरच्या सुरुवातीलाही महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याने बळीराजाची चिंता अधिकच गडद झाली आहे. पावसाने पुन्हा मोठा ब्रेक घेतल्याने ऐन वाढीच्या टप्प्यात असलेली खरीप पिके धोक्यात आली आहेत. सध्या राज्यात कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने हवामान विभागाने पुढील ४ ते ५ दिवस राज्यात कुठेही मोठ्या पावसाचा किंवा मुसळधार पावसाचा इशारा दिलेला नाही.
आज ६ सप्टेंबर २०२६ रोजीच्या हवामान अंदाजानुसार राज्यातील विविध विभागांतील स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
कोकण विभाग – कोकणात गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त काळ पावसाने पूर्णपणे उघडीप दिली आहे. दमट, उष्ण आणि ढगाळ हवामानासह काही ठिकाणी केवळ हलक्या सरींची नोंद होत आहे. पुढील काही दिवस येथे सर्वदूर पावसाची चिन्हे नाहीत.
उत्तर महाराष्ट्र – धुळे, नाशिक, जळगाव परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम किंवा तुरळक वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही; येथे उष्ण व दमट हवामान कायम राहील.
पश्चिम महाराष्ट्र – घाटमाथ्यावर पावसाने विश्रांती घेतली आहे. पुढील चार-पाच दिवसांत ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळतील, परंतु दमदार पावसाची शक्यता कमीच आहे.
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली आणि धाराशिव या सर्वच जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. सध्यातरी या भागासाठी कोणताही अलर्ट नसून केवळ तुरळक ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे, ज्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
विदर्भ – विदर्भातही पुढील ४ ते ५ दिवस पावसाने पूर्ण विश्रांती घेतल्याचे चित्र राहील. प्रभावी मान्सून प्रणाली नसल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाची तूट सातत्याने वाढत असून, दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे.




