
पंचनामा प्रतिनिधी – भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.शिक्षकांच्या ज्ञानदानाच्या कार्याचा गौरव आणि त्यांच्या योगदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे-बांगरवाडी येथे विविध विभागांच्या वतीने शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी विविध महाविद्यालये व शैक्षणिक विभागांमध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिक्षक दिनाचे महत्त्व, शिक्षकांची सामाजिक भूमिका तसेच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांचे योगदान याबाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार, डॉ. लक्ष्मण घोलप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दिनेश जाधव, प्रा. कल्याणी शेलार, बी.एस्सी. आयटी विभागाचे विभागप्रमुख प्रा. विलास गवारी, परीक्षा विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रणाली साळुंके यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
शैक्षणिक व संशोधन क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या प्राध्यापकांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रा. डॉ. हर्षदा मुळे व प्रा. डॉ. उद्धव भारती यांनी उच्च शैक्षणिक पदवी (पीएच.डी.) प्राप्त केल्याबद्दल, तर प्रा. अक्षय वाघ यांनी संशोधनपर शोधनिबंध प्रकाशित केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
तसेच उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. दिनेश जाधव, उत्कृष्ट विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी म्हणून प्रा. गणेश बोरचटे आणि उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. शुभांगी लामखडे यांचा गौरव करण्यात आला. महाविद्यालयातील विविध विभागांचा १०० टक्के निकाल लागण्यासाठी योगदान देणाऱ्या प्राध्यापकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी सर्व सन्मानित प्राध्यापकांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. उत्तम शेलार यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना विषयाचे ज्ञान देणारे नसून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, विचारांची आणि मूल्यांची जडणघडण करणारे मार्गदर्शक असतात. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांनी आधुनिक शिक्षणपद्धतींचा स्वीकार करून विद्यार्थ्यांना ज्ञानासोबत कौशल्ये आणि मूल्यांची जोड देणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत आणि प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर यांनी संस्थेतील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या अथक परिश्रमातून विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडत असून संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीत शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. उद्धव भारती यांनी केले, तर विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. गणेश बोरचटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या विविध कार्यक्रमांमुळे संपूर्ण समर्थ शैक्षणिक संकुलात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.



