
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील रानमळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याने अनेकदा शेळ्या-मेंढ्यांवर हल्ले केले असून, अनेक कुत्र्यांचाही फडशा पाडला आहे. तसेच राजमळा व वाळुंजनगर परिसरातील अनेक शेतकरी व नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे रानमळा येथील ग्रामस्थांनी वनविभागाकडे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार वनविभागाने सुमारे चार ते पाच महिन्यांपूर्वी पिंजरा लावला. मात्र, गेल्या महिनाभरापासून या पिंजऱ्याचा दरवाजा बंद असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

पिंजऱ्याचा दरवाजाच बंद असेल तर बिबट्या अडकणार कसा? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. बिबट्याचा परिसरात वावर कायम असताना पिंजऱ्याची योग्य देखभाल व तपासणी केली जाते का, याबाबतही ग्रामस्थांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बिबट्याप्रवण क्षेत्रात वनविभागाचे कर्मचारी नियमित गस्त घालतात का? पिंजऱ्याची पाहणी केली जाते का? पिंजऱ्याचा दरवाजा बंद असल्याची माहिती वनविभागाला आहे का? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केले आहेत.

बिबट्याचा वावर असलेल्या परिसरात शेतकरी, महिला, विद्यार्थी तसेच पशुपालकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे वनविभागाने पिंजऱ्याची तातडीने पाहणी करून तो कार्यान्वित करावा आणि परिसरात नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.



