संत निरंकारी मिशनच्या हरित महाअभियानात १०,३०० रोपांची लागवड ;
१,००० हून अधिक सेवादल व स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त सहभाग !!

पंचनामा प्रतिनिधी | सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६
पुणे : संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने पर्यावरण संरक्षणासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या अभियानाच्या सहाव्या टप्प्याचे आयोजन देशभरातील ग्रामीण व शहरी भागांतील ६५० ठिकाणी एकाच वेळी करण्यात आले. या महाअभियानात मिशनचे लाखो श्रद्धाळू व स्वयंसेवक सहभागी झाले असून, देशभरात सुमारे ५.५ लाख रोपांची लागवड करण्यात आली.
निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता रमित जी यांच्या पावन आशीर्वादाने आयोजित या अभियानाला बाबा हरदेव सिंह जी यांच्या ‘प्रदूषण आत असो किंवा बाहेर, दोन्हीही हानिकारक आहे’ या संदेशाची प्रेरणा आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच मानवी चेतना निर्मळ करण्याचा आणि निसर्गाप्रती जबाबदारीची भावना निर्माण करण्याचा संदेश या अभियानातून देण्यात येत आहे.
पुणे झोनमध्ये १०,३०० रोपांची लागवड
संत निरंकारी मिशनच्या पुणे झोनअंतर्गत पिंपळगाव-खडकी, भवरापूर, कोरेगाव-मुळ, खुटबाव आणि पाषाण (सुतारवाडी) या पाच ठिकाणी हरित महाअभियान राबविण्यात आले. या पाचही ठिकाणी यावर्षी एकूण १०,३०० रोपांची लागवड करण्यात आली.
यावर्षी पिंपळगाव-खडकी (ग्रामपंचायत पिंपळगाव-खडकी अंतर्गत सेक्टर–आळेफाटा) या ठिकाणाचा नवीन ‘वननेस वन’ स्थळ म्हणून समावेश करण्यात आला. येथे सुमारे १,५२,४६० चौरस फूट क्षेत्रात ५,००० रोपांची लागवड करण्यात आली.
४२,७८५ वृक्षांचे संवर्धन
रोपलागवडीसोबतच पुणे झोनमध्ये मागील वर्षांत लावण्यात आलेल्या ४२,७८५ वृक्षांचे संवर्धन व देखभाल करण्याचे कार्यही सेवादारांनी केले. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या सर्व ठिकाणी लावण्यात आलेल्या रोपांची १०० टक्के जिवंतता कायम राहिली आहे. नियमित देखभाल, वृक्षसंवर्धन आणि समर्पित सेवेचे हे एक आदर्श उदाहरण ठरत आहे.
संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री. जोगिंदर सुखीजा जी यांनी सांगितले की, ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमाने आज देशव्यापी जनआंदोलनाचे स्वरूप धारण केले आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये ६५० हून अधिक ‘वननेस वन’ स्थळांवर श्रद्धाळू आणि सेवादार पूर्ण समर्पित भावनेने वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करीत आहेत.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ रोपांची लागवड करून जबाबदारी संपत नाही. लावलेली रोपे मोठी होऊन वृक्ष बनेपर्यंत त्यांचे सातत्याने संरक्षण करण्याचा संकल्प मिशनच्या माध्यमातून केला जातो. प्रत्येक रोपाची तीन ते पाच वर्षांपर्यंत नियमित देखभाल केली जाते. त्यामुळे भविष्यात घनदाट लघुवने निर्माण होऊन जैवविविधता समृद्ध होण्यास, स्थानिक परिसंस्थेला बळकटी मिळण्यास आणि भावी पिढ्यांना स्वच्छ व हिरवेगार वातावरण उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.




