
धामणी (ता. आंबेगाव) : धामणी गावातील श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शताब्दी महोत्सवाला आज धर्मध्वज उभारणीच्या मंगल सोहळ्याने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित या सोहळ्यास वारकरी संप्रदायातील मान्यवर संत-महंतांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यावेळी वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. विष्णू महाराज केंद्रे, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज ह.भ.प. माणिक महाराज मोरे तसेच आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर माऊली दिंडी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पूजन करून धर्मध्वज उभारण्यात आला. धर्मध्वज फडकविण्यात आल्यानंतर उपस्थित भाविकांनी जयघोष करत या मंगल सोहळ्याचा आनंद व्यक्त केला.

श्रीकृष्ण जन्मोत्सवाला शंभर वर्षांची परंपरा लाभल्याने यंदाचा शताब्दी महोत्सव ग्रामस्थांसाठी विशेष महत्त्वाचा ठरला आहे. धर्मध्वज उभारणीमुळे गावात आजपासून भक्तिमय व धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, आगामी शताब्दी महोत्सवातील विविध धार्मिक कार्यक्रमांची उत्साहपूर्ण सुरुवात झाली आहे.
या महोत्सवानिमित्त गावात विविध धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, परिसरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने धामणी गावातील धार्मिक परंपरा आणि वारकरी संस्कृतीचा जागर होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

धर्मध्वज उभारणीच्या सोहळ्यास ग्रामस्थ, वारकरी, भाविक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात ‘श्रीकृष्ण भगवान की जय’ तसेच विठ्ठल नामाचा गजर होत असल्याने धामणी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली.






