
पंचनामा प्रतिनिधी – धामणी (ता.आंबेगाव) श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून धामणी नगरीत श्रीकृष्ण जन्माष्टमी शताब्दी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. शताब्दी वर्षानिमित्त आयोजित या विशेष महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत, सुप्रसिद्ध व लोकप्रिय हरिभक्त परायण कीर्तनकारांची भक्तिमय कीर्तने भाविकांना ऐकण्याची पर्वणी मिळणार आहे.

या निमित्ताने सलग आठ दिवस भव्य कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला असून, दररोज एका नामवंत कीर्तनकाराचे रसाळ, प्रबोधनपर व भक्तिरसपूर्ण कीर्तन सादर होणार आहे. अभंग, गवळणी, भारूड, संतचरित्रे, श्रीकृष्णलीला तसेच समाजप्रबोधनपर विचारांच्या माध्यमातून भाविकांना ज्ञान, भक्ती आणि संस्कारांचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे.
शताब्दी वर्षानिमित्त होणारा हा सोहळा केवळ कीर्तनांचा कार्यक्रम नसून, शंभर वर्षांच्या भक्तीपरंपरेचा गौरव करणारा ऐतिहासिक उत्सव असल्याचे आयोजकांनी सांगितले. आठ दिवस हरिनामाचा गजर, संतवाणीचा जागर आणि श्रीकृष्ण भक्तीमय वातावरणाने धामणी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघणार आहे.

या महोत्सवाला गावातील आबालवृद्ध, महिला, युवक-युवती तसेच पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शताब्दी सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
॥ जय श्रीकृष्ण ॥
॥ राम कृष्ण हरी ॥




