आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात जोरदार पावसामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान!!
आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात जोरदार पावसामुळे बळीराजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान!!
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या जोरदार वाऱ्यासह दमदार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक पिके या वारा आणि पावसामुळे जमीनदोस्त झाली आहेत काही ठिकाणी पत्रा शेड गोठ्यांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये शासनाच्या वतीने पहानी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी, काठापुर,लाखणगाव,पारगाव,जारकरवाडी परिसरात जोरदार वाऱ्यासह दमदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अनेक पिके भुईसपाट झाली. वारा आणि पाऊस एकत्र असल्याने शेती पिके सपाट झाली आहेत.हा पाऊस निरगुसर,अवसरी,पिंपळगाव खडकी, चांडोली,मंचर याही परिसरात जोरदार झाला. त्यामुळे सर्वत्र शेतात पाणी पाणी साचले होते. विहिरी तुडुंब भरल्या असुन काही विहिरींचे पाणी विहिरीवरून वाहत होते. अनेक शेतात पाणी साचले असून पुढील 15 दिवस शेतीत वापसा होणार नसल्याने शेतातील पिके सडून जाणार आहेत. तर नवीन पिके घेता येनार नाही. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.
काठापूर बुद्रुक तालुका आंबेगाव येथील हनुमंत तुकाराम जाधव यांचे शेतात असलेले पत्राशेड वाऱ्याने उडून गेले, शेडचे पत्रे 200 ते 300 फुट पर्यंत लांब गेले आहेत. यामुळे जाधव यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या आहेत.खांब वाकले आहेत. त्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.