
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लाखणगाव, देवगाव, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, बडेकरमळा, काठापूर, वाळुंजनगर आदी परिसरात सध्या कांदा लागवडीला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे पाण्याची उपलब्धता वाढल्याने शेतकऱ्यांनी कांदा लागवडीवर भर दिला आहे.
परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने कांदा तसेच आगामी रब्बी हंगामातील पिकांसाठी पाण्याची उपलब्धता समाधानकारक आहे. त्यातच गेल्या महिनाभरापासून कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीकडे आपला मोर्चा वळविल्याचे चित्र परिसरात दिसत आहे.
सध्या शेतातील इतर कामांसह कांदा लागवडीची लगबग सुरू आहे. मात्र एकाच वेळी मोठ्या प्रमाणात लागवडीची कामे सुरू असल्याने कांदा लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याची समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली आहे. परिणामी मजुरीच्या दरात वाढ झाली असून उत्पादन खर्चातही भर पडत आहे.
मजुरांची टंचाई लक्षात घेता अनेक शेतकरी कांदा लागवडीसाठी पारंपरिक ‘सावड’ पद्धतीचा अवलंब करताना दिसत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील वीजपुरवठ्यातील वारंवार होणाऱ्या खंडिततेमुळेही शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
चांगला पाऊस, पाण्याची उपलब्धता आणि सध्या मिळत असलेला कांद्याचा समाधानकारक बाजारभाव यामुळे आंबेगावच्या पूर्व भागात यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे सुरू असलेली कांदा लागवडीची लगबग.



