
पंचनामा प्रतिनिधी- आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव, काठापूर, लाखणगाव, जारकरवाडी, जवळे आदी गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दिवसा व रात्री सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे शेतकरी, व्यावसायिक तसेच विद्यार्थी वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पारगाव परिसरात गेल्या महिनाभरापासून अनियमित वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पारगाव ही आंबेगाव तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून परिसरात विविध प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहेत. वारंवार वीज खंडित होत असल्याने व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या कामकाजावरही परिणाम होत आहे.
या परिसरात शेती व शेतीपूरक व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केले जातात. मात्र, अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देणे अशक्य होत आहे. परिसरात पाण्याची उपलब्धता मुबलक असतानाही वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, परिसरात ऊसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिक व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास शेतकऱ्यांना शेतात जाणे अधिक धोकादायक ठरत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
महावितरण विभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन पारगाव व परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करावा. विशेषतः रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध करून द्यावी व रात्रीचे अघोषित भारनियमन टाळावे, अशी मागणी पारगावचे माजी उपसरपंच सचिन दत्तात्रय अस्वारे व ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे यांनी केली आहे.
वीजपुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास शेतकरी व नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता असून महावितरणने याबाबत तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.



