
पंचनामा प्रतिनिधी जवळे – ग्रामपंचायत जवळे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास केवळ १८५७ पासून सुरू होत नाही. त्याआधीच दख्खनच्या डोंगरदऱ्यांतून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रज सत्तेला उघड आव्हान दिले होते. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील या महान क्रांतिकारकाचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

दि. ७ सप्टेंबर रोजी आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यलढ्यातील नाईक, रामोशी व किल्लेदार समाजाच्या योगदानाला इतिहासाच्या मध्यभागी आणणे गरजेचे असून, राजे उमाजी नाईक यांच्या पराक्रमाचा गौरव सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

राजे उमाजी नाईक यांच्या शौर्यपूर्ण आठवणींना मच्छिंद्र लायगुडे शाहीर यांनी आपल्या शाहिरी काव्यातून उजाळा दिला. त्यांच्या पोवाड्याचा बालचमूंनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने आस्वाद घेतला.

या कार्यक्रमास हरिचंद्र शिंदे, अंकुश गायकवाड, दत्तात्रय लायगुडे, पंढरीनाथ टाव्हरे, उत्तम शिंदे पाटील, नवनाथ शिरतार, विशाल शिरतर, सुरेश शिरतर, किरण शिरतर, अनिकेत मंडलिक, अशोक लोखंडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जवळे गावच्या आदर्श सरपंच तथा प्रशासक सौ. वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी कार्यक्रमाची माहिती दिली.



