
पंचनामा प्रतिनिधी – काही जाहिराती उत्पादन विकण्यासाठी बनवल्या जातात, तर काही जाहिराती थेट मनाला भिडतात. नुकतीच प्रदर्शित झालेली विनोद कांबळी यांची आईस्क्रीम ब्रँडसाठीची जाहिरात ही अशाच जाहिरातींपैकी एक ठरली आहे. जाहिरात संपते, पण तिची भावना मनातून जात नाही. कारण या जाहिरातीत फक्त आईस्क्रीम नाही, तर एका संघर्षमय आयुष्याची वेदना, अपयशाची चटका आणि पुन्हा उभं राहण्याची आशा दडलेली आहे.
एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारा विनोद कांबळी आजही लाखो क्रिकेटप्रेमींच्या मनात विशेष स्थान राखून आहे. त्यांच्या फलंदाजीवर लोक फिदा होते. अनेकांना वाटत होतं की हा खेळाडू भारतीय क्रिकेटच्या इतिहासात मोठा अध्याय लिहील. पण आयुष्याने वेगळाच डाव खेळला. क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर कांबळींना अनेक वैयक्तिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणींचा सामना करावा लागला.

गेल्या काही वर्षांत त्यांच्या तब्येतीबद्दलच्या बातम्या समोर आल्या, काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि प्रत्येक वेळी क्रिकेटप्रेमींच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला—”हा तोच विनोद कांबळी आहे का?”
अशातच एका आईस्क्रीम ब्रँडने त्यांना जाहिरातीसाठी निवडलं आणि अचानक सोशल मीडियावर भावना उसळल्या. कारण लोकांना ही केवळ जाहिरात वाटली नाही. अनेकांना ती एका हरवलेल्या नायकाला दिलेली संधी वाटली.

सोशल मीडियावर हजारो लोकांनी एकच भावना व्यक्त केली—”एखाद्याला मदत करायची असेल तर फक्त पैसे देऊन नाही, तर त्याला पुन्हा कामाची संधी देऊन करा.” अनेकांनी लिहिलं की, एखाद्या व्यक्तीची गरज ओळखून त्याच्याकडून काम करून घेणं आणि त्याचा योग्य मोबदला देणं हीच खरी मदत असते.

या जाहिरातीतील कांबळींचा चेहरा पाहताना अनेकांना त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीच्या आठवणी जाग्या झाल्या. मैदानावरचा आत्मविश्वास, प्रेक्षकांचा जल्लोष आणि त्यानंतर आलेले कठीण दिवस—सगळं काही काही सेकंदांत डोळ्यांसमोरून गेलं.

विशेष म्हणजे जाहिरात व्हायरल होताच तिच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांनी अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला. अनेकांनी ब्रँडचे कौतुक केले. काहींनी तर स्पष्ट शब्दांत लिहिलं की, “आजपासून या ब्रँडचीच आईस्क्रीम खाणार. कारण त्यांनी फक्त जाहिरात केली नाही, तर एका माणसाला पुन्हा उभं राहण्याची संधी दिली.”

क्रिकेटप्रेमींसाठी विनोद कांबळी हा केवळ एक माजी क्रिकेटपटू नाही. तो एक अपूर्ण राहिलेलं स्वप्न आहे. एक अशी कहाणी, ज्यात अफाट प्रतिभा होती, पण नियतीने वेगळाच मार्ग निवडला. म्हणूनच आजही लोक त्यांच्या यशासाठी प्रार्थना करतात.
या जाहिरातीमुळे कांबळींना आणखी काही जाहिराती आणि कामांच्या ऑफर मिळाल्याची चर्चाही रंगू लागली आहे. हे खरं ठरलं, तर कदाचित त्यांच्या आयुष्याची दुसरी इनिंग सुरू होऊ शकते.
कारण माणूस कधीच पूर्णपणे हरत नाही. परिस्थिती त्याला खाली खेचू शकते, पण समाजाने हात दिला तर तो पुन्हा उभाही राहू शकतो.
आणि कदाचित म्हणूनच ही जाहिरात लोकांच्या मनात घर करून गेली. आईस्क्रीमचा स्वाद किती चांगला आहे यापेक्षा, एका संघर्ष करणाऱ्या माणसाला पुन्हा संधी मिळाली याचा आनंद लोकांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
कधी कधी एक छोटीशी जाहिरातही मोठा संदेश देऊन जाते — “मदत म्हणजे दया नाही, तर एखाद्याला पुन्हा स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी देणं.”

