
पंचनामा प्रतिनिधी – समीर गोरडे
आषाढी एकादशीच्या पर्वानिमित्त शिंगवे गावात भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकात्मतेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. जिल्हा परिषद माॅडेल स्कुल शिंगवे शाळेने आयोजित करण्यात आलेला आनंदवारी दिंडी सोहळा उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. हरिनामाच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि अभंगांच्या स्वरांत संपूर्ण शिंगवे गाव भक्तिरसात न्हाऊन निघालेले पहावयास मिळाले.

विशेष म्हणजे, लहानग्या विद्यार्थ्यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, वारकरी आणि विविध ऐतिहासिक व धार्मिक व्यक्तिरेखांची साकारलेली रूपे उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे वारकरी परंपरा आणि सांस्कृतिक वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यातआला.





दिंडी मार्गावर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. अनेकांनी हरिनामाचा गजर करत दिंडीत सहभाग नोंदविला. गावातील ज्येष्ठ नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मुलांमध्ये भक्तीभाव, शिस्त, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले. या सोहळ्यासाठी विविध मान्यवर, पालकवर्ग, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच शिंगवे ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या आनंदवारी दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभाव, सांस्कृतिक मूल्ये, वारकरी परंपरेबद्दल आदर आणि सामाजिक एकात्मतेची भावना दृढ होण्यास मदत झाली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शिंगवेकरांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

