
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर, मांदळेवाडी ,लोणी,पहाडदरा,शिरदाळे परिसरात पाऊस लांबणीवर पडल्याने चारा टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. या भागात गोपालन व दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने चाऱ्याअभावी शेतकरी व पशुपालक मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
यावर्षी मान्सूनच्या उशिरामुळे शेतांमध्ये हिरवा चारा उपलब्ध झाला नसून अनेक ठिकाणी जनावरांसाठी आवश्यक चारा व पाण्याची कमतरता भासत आहे. परिणामी दूध उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुग्ध व्यवसायावर अवलंबून असलेल्या अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
जनावरांना पुरेसा चारा मिळत नसल्याने पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. चारा खरेदीसाठी वाढत्या खर्चामुळे पशुपालकांचे आर्थिक गणितही कोलमडले आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने या परिसरात चाऱ्याची उपलब्धता करून द्यावी तसेच आवश्यक त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वडगावपीरचे माजी सरपंच संजय पोखरकर आणि मांदळेवाडी येथील उद्योजिका ज्योती गोरडे यांनी केली आहे.







