
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील वळती येथील वाळुंज मळा परिसरात आज दुपारच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून दोन सख्ख्या भावांची घरे जळून खाक झाली.
किसन नामदेव भोर व हरिभाऊ नामदेव भोर या दोन्ही सख्ख्या भावांच्या घरात अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने घरातील संसारोपयोगी साहित्य, फर्निचर, धान्य, कपडे व इतर वस्तू जळून मोठे नुकसान झाले.

आगीची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तसेच भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यास मोठी मदत झाली. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आली व पुढील मोठी हानी टळली.

या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन्ही कुटुंबांचे घरांसह संसारोपयोगी साहित्य जळून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची गंभीर दखल घेऊन महसूल व प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करावा व बाधित कुटुंबांना शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वळती परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.








