
पंचनामा प्रतिनिधी – वळती (ता. आंबेगाव) येथील युवा ताशा वादक जालिंदर लहू शेवाळे यांना “आंबेगाव भूषण” या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची अभिमानास्पद घटना घडली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका, युगप्रवर्तक प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य) घोडेगाव, तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक व संविधान भवन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय शिंदे, आंबेगाव पंचायत समितीचे सभापती कैलासबुवा काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात, पंचायत समितीच्या उपसभापती ज्योतीताई पारधी, ज्येष्ठ पत्रकार डि. के. वळसे पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले, आप्पा बोऱ्हाडे, सखारामजी घोडेकर, युगप्रवर्तक प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतमराव खरात, सचिव प्रकाश सोनवणे, विठ्ठल टिंगरे, गौतम रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

जालिंदर शेवाळे यांनी ताशा वादनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पारंपारिक लोककलेला नवे आयाम दिले आहेत. त्यांच्या वादनात पारंपरिकतेसोबतच आधुनिकतेची सांगड दिसून येते. त्यांनी केवळ स्वतःची कला जोपासली नाही, तर अनेक तरुणांना ताशा वादनाचे प्रशिक्षण देत त्यांना योग्य दिशा देण्याचेही काम केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवकांनी या कलेत प्रावीण्य मिळवले असून गावोगावी सांस्कृतिक जपणुकीस हातभार लागला आहे.
शेवाळे हे सामाजिक क्षेत्रातही सक्रिय असून वळती गावातील भागडेश्वर पतसंस्थेचे ते विद्यमान संचालक आहेत. तसेच वनसंरक्षण समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. कला, समाजकार्य आणि नेतृत्व या तिन्ही क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना “आंबेगाव भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले.

या सन्मानामुळे वळती गावासह संपूर्ण आंबेगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांनी जालिंदर शेवाळे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रसिद्ध युवा ताशा वादक जालिंदर लहू शेवाळे यांना “आंबेगाव भूषण” पुरस्कार प्रदान करताना उपस्थित मान्यवर

