
विविध क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांना मिळाले व्यासपीठ; गुणवंत खेळाडूंचा गौरव !!
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल, बेल्हे-बांगरवाडी येथे राष्ट्रीय क्रीडा दिन आणि हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त विविध क्रीडा स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करून क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम, संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि निरोगी जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
या कार्यक्रमासाठी डॉ. संतोष शेळके, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे तसेच डॉ. विजय तांबे, प्राचार्य, फार्मसी महाविद्यालय, सिन्नर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ. उत्तम शेलार, डॉ. लक्ष्मण घोलप, विविध विभागांचे क्रीडा प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त संकुलात कॅरम, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, लांब उडी, उंच उडी यांसह विविध मैदानी व इनडोअर क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले. विशेष आकर्षण ठरलेल्या कबड्डीच्या अंतिम सामन्यात समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट आणि समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स यांच्यात अटीतटीची लढत झाली. या सामन्यात समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटने विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विविध क्रीडा स्पर्धांमध्ये तसेच स्पर्धात्मक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये विघ्नेश पवार, जीवन बांगर, राम दांगट, समृद्धी जाधव, दीक्षा गाडगे, वैष्णवी गायखे, इशिता काकडे, दीक्षा भोर, महेश केदारी, कोमल घोडे आणि ओम गोरडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करून त्यांना भविष्यातही सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. संतोष शेळके म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडेलाही तितकेच महत्त्व आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, निर्णयक्षमता, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात. जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिक ताकदही खेळातून निर्माण होते.”
समर्थ शैक्षणिक संकुलाच्या वतीने विद्यार्थ्यांना विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षण व सरावासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी या सुविधांचा अधिकाधिक लाभ घेऊन आपल्या आवडीनुसार विविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळवावे, असे आवाहनही त्यांनी केले.
मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडाक्षेत्रातील अतुलनीय योगदानाचे स्मरण करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी. मेहनत, चिकाटी आणि सातत्याच्या बळावर क्रीडा क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहल ताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत आणि प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी आयोजकांचे कौतुक करून गुणवंत खेळाडूंना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा शिक्षक सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी आणि आश्विनी जगदाळे यांनी विशेष योगदान दिले. क्रीडा संचालक एच. पी. नरसुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. गणेश बोरचटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला असून, ‘शिक्षणासोबत क्रीडा आणि क्रीडेसोबत व्यक्तिमत्त्व विकास’ या संकल्पनेला समर्थ शैक्षणिक संकुलाने प्रभावीपणे चालना दिली.




