
पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी- आंबेगाव तालुक्यासहित लगतच्या तालुक्यांना व जिल्ह्यांना वरदान ठरलेल्या डिंभे धरणातुन सध्या शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे.आधीच झाडे झुडपे यांच्या गर्दीत हरवून गेलेला उजवा कालवा आता पाण्यासोबतच मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा घन कचरा वाहून नेताना दिसून येतो आहे.

जारकरवाडी लगतच्या धामणी खिंड परिसरातून गेलेल्या कालव्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा घन कचरा साठला आहे.शेतकऱ्यांनी टाकलेल्या लोखंडी पाईप लाईनला हे प्लास्टिक अडकले असून यात प्लास्टिक बाटल्या,प्लास्टिक वस्तू, प्लास्टिक फोम,प्लास्टिक पिशव्या, शीतपेयांच्या प्लास्टिक बाटल्या, पत्रावळी,विविध प्रकारच्या दारूच्या प्लास्टिक बाटल्या आदी वस्तू अडकून राहिल्या आहेत.

दैनंदिन जीवनात आपण सर्रासपने प्लॅस्टिकच्या वस्तू वापरत आहोत. त्यांना तडा गेल्यास अथवा त्या फुटल्या की कचराकुंडी ऐवजी थेट कालव्यात टाकल्या जातात.रिकाम्या पाण्याच्या बाटल्या यांचे प्रमाण यात सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.

प्लॅस्टिक वस्तूंचे विघटन होण्यासाठी खूप वर्षांचा कालावधी लागतो याशिवाय या प्लास्टिकचा सजीवांच्या जीवनावर व अन्न साखळीवर देखील विपरित परिणाम होतो.तरी देखील प्लास्टिक बाटल्या व विविध वस्तू आपण वापरत कमी करत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येते आहे.

सध्या तरी डिंभे धरणाचा उजवा कालवा पाण्यासोबतच प्लास्टिक वस्तू वाहून नेणारा कालवा बनला असून संबंधित विभागाने मात्र याकडे सोईस्करपने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र आहे.
