
पंचनामा प्रतिनिधी – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा थोरांदळे (ता.आंबेगाव) या शाळेतील विद्यार्थ्यांनीउच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि एन.एम.एम.एस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.इयत्ता सातवीतील आदित्य संजय परदेशी याने २८० गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच शाळेतील तब्बल सात विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले आहे.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
प्रजाहितदक्ष पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.
याप्रसंगी इयत्ता सातवीतील राज्य शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी आदित्य संजय परदेशी-२८० गुण (राज्यात सातवा क्रमांक) तसेच जिल्हा गुणवत्ता यादीतील मानकरी रुद्र भाऊसाहेब वाळुंज-२७० गुण,यज्ञेश अविनाश मिंडे-२५४ गुण,मान्यता मनोज लोखंडे-२५० गुण,आर्या नितीन टेमगिरे-२४४ गुण,आरुष मनोज शिंदे-२४२ गुण,श्वेता अनिल गुंड-२३८ गुण,रुतेश गणेश निकम-२३६ गुण आणि एन.एम.एम.एस परीक्षा शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी प्रणाली शिंगाडे हिने गुणवत्तापूर्ण यशाचा ठसा उमटविला याबद्दल मान्यवरांच्या हस्ते पुणेरी पगडी,शाल,फेटा बांधून लेखनी आणि पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
यशस्वी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका कमल संतोष थोरात,पदवीधर शिक्षक विनायक पडवळ,राज्य आदर्श पुरस्कार प्राप्त बाळासाहेब कानडे,शैला थोरात,संदीप शिंदे,विजय डोके,मिलिंद चिखले,श्वेता चिखले,अनिकेत आवटे,मंगल वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.
मुख्याध्यापक हेमराज भदाणे,केंद्रप्रमुख सीमा कहडणे, शिक्षण विस्तार अधिकारी शैला निमसे,गटशिक्षण अधिकारी रुपाली धोका,गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज,पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाळेच्या या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश टेमगिरे,उपाध्यक्ष सागर विश्वासराव,सदस्य मनोहर पोखरकर,सचिन टेमगिरे,रामदास मिंडे,देवराम घुले,पालक संजय परदेशी,ग्रामपंचायत थोरांदळे आणि पालक वर्ग यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन लाभल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही राज्य व जिल्हा पातळीवर उज्ज्वल यश संपादन करू शकतात, हे या कामगिरीतून सिद्ध झाले आहे.




