
पंचनामा प्रतिनिधी – सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर जारकरवाडी येथील अनिल ज्ञानेश्वर भांड यांनी महाराष्ट्र पोलीस दलात निवड होण्याचे उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांच्या या यशामुळे जारकरवाडी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अनिल भांड यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जारकरवाडी येथे झाले. सर्वसामान्य कुटुंबातील परिस्थिती असूनही त्यांनी आपल्या स्वप्नांवर कधीही पाणी फेरू दिले नाही. पोलीस दलात दाखल होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी शिक्षणासोबतच सातत्याने पोलीस भरतीची तयारी सुरू ठेवली.
प्रवासात अनेक अडचणी आल्या, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला; मात्र त्यातून खचून न जाता त्यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटी कायम ठेवली. अखेर त्यांच्या अथक प्रयत्नांना यश मिळाले आणि महाराष्ट्र पोलीस दलात निवड होण्याचे स्वप्न साकार झाले.
सर्वसामान्य कुटुंबातील युवकाने केवळ मेहनतीच्या बळावर मिळवलेले हे यश जारकरवाडी व परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या निवडीची माहिती समजताच ग्रामस्थ, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अनिल भांड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
जिद्द, प्रामाणिक मेहनत आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड असेल, तर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती यशाच्या आड येऊ शकत नाही, हे अनिल भांड यांच्या यशाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे.






