
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालूकाच्या पूर्व भागातील लोणी,धामणी, वडगावपीर परिसरात महावितरणकडून गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी कधीही, केव्हाही अघोषित भारनियमन केले जात असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दिवसा तसेच सायंकाळच्या वेळेतही अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यातच पावसाने तान दिल्याने हातातोंडाशी आलेली पिके सुकून जाण्याच्या मार्गावर आहे. या पिकांना सध्यातरी पाण्याची गरज आहे. पण या
अघोषित भारनियमनामुळे पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
तसेच या परिसरात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने शेतकरी अगोदर भयभीत झाला आहे आणि आता या अघोषित भारनियमानामुळे शेतकरी खरोखर हतबल झाला आहे.यापूर्वी या परिसरात बिबट्याने नागरीक, जनावरे यांच्यावर अनेक वेळा हल्ले केले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांच्या भीतीत आणखी भर पडत आहे. शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
सध्या शेतीची विविध कामे सुरू असून पिकांना पाण्याचे नियोजन करण्यासाठी वीजपुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, रात्रीच्या वेळी वीज नसल्याने शेतकऱ्यांची कामे खोळंबत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. जर हे अघोषित भारनियमन रद्द झाले नाही तर महावितरणच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी ग्रामस्थांनी दिला आहे.
अघोषित भारनियमना संदर्भात महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधला असता ते उडवाउडवीची उत्तरे देतात असे लोणीचे सरपंच राजेंद्र वाळूज, पारगाव जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी क्रॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष बाळशिराम वाळूंज यांनी सांगितले.
या संदर्भात दोन दिवसात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देणार असल्याचे बाळशिराम वाळूंज यांनी सांगितले.





