
पंचनामा प्रतिनिधी – नागपंचमीच्या निमित्ताने लोणी (धामणी) येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध भव्य कलगीतुरा सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. सोमवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन, बाजारतळ, लोणी येथे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाच्या या पारंपरिक कलाविष्काराचे ३४ वे वर्ष होते.
कार्यक्रमाची सुरुवात पंचरास मंडळी, लोणी यांच्या गणाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धवराव लक्ष्मण लंके यांनी केले. भैरवनाथ विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन सौ. रुक्मिणीताई वसंत वाळुंज, कैलास सिनलकर, उद्योजक संभाजी पडवळ, कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव भागवत, शिवाजी शिनलकर, उपसरपंच राजेंद्र वाळुंज, समाजभूषण कैलासराव गायकवाड, सदाशिव आदक मामा व दशरथ शिनलकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रेडिओस्टार शाहीर तुरेवाले साहेबराव पवार (किन्हई-करंडी) आणि कलगीवाले शाहीर तान्हाजी माळवदकर (गुंळुचवाडी, बेल्हे) यांच्यात रंगलेला कलगीतुरा सामना विशेष आकर्षण ठरला. शाहिरांच्या दमदार सवाल-जवाबांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले. पारंपरिक लोककलेचा हा अविष्कार पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.
कार्यक्रमाला डॉ. सावळाभाऊ नाईक (लोकनियुक्त सरपंच), मा. पंचायत समिती सदस्य प्रदीप नाना धुमाळ, सामाजिक कार्यकर्ते बळीराम वाळुंज, माजी प्राचार्य वसंतराव वाळुंज, नामदेवराव हरिचंद्र वाळुंज, राहुल सोनवणे, बबनराव विठोबा वाळुंज, पोलीस पाटील संदीप आढाव, बाळासाहेब आदक, सोपान वाळुंज, सोन्याबापू वाळुंज व येडू आदक पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
राजकीय व सामाजिक क्षेत्रातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीपदादा वळसे पाटील, माजी चेअरमन देवदत्त निकम, संचालक बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, खरेदी-विक्री संघाचे माजी पदाधिकारी अनिल वाळुंज तसेच शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंबेगाव, शिरूर, खेड, हवेली, पारनेर आणि जुन्नर परिसरातून मोठ्या संख्येने रसिक श्रोते लोणी येथे दाखल झाले होते. यावेळी ज्येष्ठ शाहीर कै. रामदास गुंड यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे आयोजन कलगीतुरा मंडळ लोणी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले होते. नागपंचमीच्या निमित्ताने पारंपरिक कलाविष्काराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा ग्रामीण भागातील लोककला व सांस्कृतिक परंपरा आजही तितक्याच ताकदीने जिवंत असल्याचे अधोरेखित करणारा ठरला.





