
पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्राची समृद्ध लोककला, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी ताशा वादनाच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील उत्कृष्ट ताशा वादक निलेश दत्तात्रय गायकवाड यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले.
पुणे येथे आयोजित राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात कला, साहित्य, समाजसेवा, शिक्षण, आरोग्य, उद्योग, कृषी, क्रीडा, पत्रकारिता आदी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी निलेश गायकवाड यांच्या ताशा वादन क्षेत्रातील योगदानाची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

निलेश गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून ताशा वादनाच्या माध्यमातून महाराष्ट्राची लोककला आणि ढोल-ताशा संस्कृती जपण्याचे कार्य करीत आहेत. पारंपरिक वाद्यकलेचा अभ्यास, सातत्यपूर्ण सराव आणि आपल्या कलेप्रती असलेली निष्ठा यामुळे त्यांनी ताशा वादन क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम आणि सार्वजनिक सोहळ्यांमध्ये त्यांनी आपल्या कलेचे सादरीकरण केले आहे.

ताशा वादन ही केवळ मनोरंजनाची कला नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. या कलेच्या माध्यमातून युवा पिढीला पारंपरिक संस्कृतीशी जोडण्याचे काम गायकवाड करीत आहेत. त्यांच्या या कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत त्यांना ‘राष्ट्रीय भारत गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

या सन्मानाबद्दल अवसरी बुद्रुक तसेच आंबेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून निलेश गायकवाड यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या पुरस्कारामुळे आंबेगाव तालुक्याच्या सांस्कृतिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.





