
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील सर्वर्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विद्यार्थ्यांची पारंपरिक दिंडी उत्साहात पार पडली. या दिंडीत विद्यार्थी टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल-रुक्मिणीच्या जयघोषात आणि अभंग-भजनांच्या सुरावटीत सहभागी झाले.

या कार्यक्रमात सर्व शिक्षक, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना आषाढी वारीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा जपणारी वारी ही केवळ पंढरपूरची यात्रा नसून, ती समता, बंधुभाव, शिस्त, सेवा, संयम आणि भक्तीचा संदेश देणारी लोकचळवळ आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यासह संतपरंपरेने दिलेले विचार समाजात रुजविण्याचे कार्य वारीच्या माध्यमातून आजही होत आहे. सर्व जाती-धर्म, वय आणि सामाजिक स्तरातील वारकरी एकत्र चालत “माऊली”चा गजर करतात, हा सामाजिक ऐक्याचा आदर्श मानला जातो.

शाळेत आयोजित या दिंडीमुळे विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीची ओळख झाली तसेच वारकरी संप्रदायातील मूल्ये, संतवाङ्मय आणि सामाजिक ऐक्याचा संदेश प्रत्यक्ष अनुभवता आला. कार्यक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी चासकर, सहशिक्षक अब्दुल इनामदार, सहशिक्षक गोरक्ष उकिरडे , सहशिक्षिका रेखा वळसे, सहशिक्षिका उज्वला लंगडे, सहशिक्षिका सुनिता रोडे , सहशिक्षक अशोक किरवे, सहशिक्षक सुदर्शन रासकर यांनी केले.बच्चू मंचरे यांस कडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

