
पंचनामा प्रतिनिधी – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त अवसरी बुद्रुक येथे भव्य कृषी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. अवसरी बुद्रुक, जवळे, निरगुडसर,अवसरी खुर्द, पिंपळगाव, गावडेवाडी, चांडोली खुर्द व चांडोली बुद्रुक या आठ गावांतील कृषीदूत विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. श्रीमती सारिका हिंगे (सरपंच, अवसरी बुद्रुक) उपस्थित होत्या. यावेळी मा. श्री. अनिल हिंगे (उपसरपंच), विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख व्याख्याते भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत कांदा व लसूण संशोधन संचालनालय (DOGR), राजगुरूनगर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र काळे यांनी कांदा व लसूण लागवडीतील आधुनिक तंत्रज्ञान, खत व पाणी व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण आणि साठवणूक याविषयी मार्गदर्शन केले. उपप्राचार्य व कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पाटील यांनी RAWE कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करत कृषीदूत हे शेतकरी व कृषी विद्यापीठ यांच्यातील ज्ञानाचा प्रभावी दुवा असल्याचे सांगितले.
मा. विकास चव्हाण (संचालक, श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना) यांनी “कृषी व्यवसाय व्यवस्थापक : कृषी विकासाचा सेतू” या विषयावर मार्गदर्शन केले.संजीव इंदोरे यांनी तुर्किस्तान बाजरा या दुर्मिळ वाणाचे महत्त्व व संवर्धनाची गरज स्पष्ट केली, तर ओंकार वाळुंज यांनी जैविक शेती, मृदा आरोग्य व्यवस्थापन व शाश्वत कृषी पद्धतींचे महत्त्व विषद केले.
चर्चासत्रात शेतकऱ्यांनी पीक व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, हवामान बदल, सुधारित वाण, बाजारपेठ व आधुनिक कृषी तंत्रज्ञानासंदर्भात प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांचे शास्त्रीय व व्यवहार्य निरसन केले. यावेळी विविध पिकांचे प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहितीही उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एम. डी. जगताप, विद्यापीठ अधिष्ठाता प्रतिनिधी डॉ. वाय. सी. साळे, डॉ. एम. बी. निचीत, प्रा. आर. आर. गिरंगे, प्रा. वैशाली घोलप, प्रा. भक्ती चव्हाण व प्रा. दिग्विजय पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषिकन्या यांनी केले, तर कृषिदूत यांनी उपस्थित मान्यवर, शेतकरी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले.

