
पंचनामा प्रतिनिधी – आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून सततच्या मुसळधार पावसामुळे नदीपात्रातील पाणी झपाट्याने वाढत आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविक आणि वारकरी आळंदीत दाखल होत असताना प्रशासनाने विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठावरील घाट आणि काही परिसर पाण्याखाली गेल्याने भाविकांनी कोणत्याही परिस्थितीत नदीच्या काठावर जाऊ नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक प्रशासन सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. वारकरी आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, अनावश्यक गर्दी टाळावी आणि स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता जपावी. पावसाचा जोर कायम असल्याने पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.





