
पंचनामा प्रतिनिधी – पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे विमानतळावर वाढती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी विमानतळ प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता विमानतळ टर्मिनल परिसरात प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या खासगी चारचाकी वाहनांना आता १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबता येणार नाही. जर एखादे वाहन १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिथे उभे राहिले, तर चालकावर ५०० रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

नेमका त्रास काय होतो?
सध्या पुणे विमानतळावरून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होत असते. अनेक नागरिक आपल्या नातेवाईकांना विमानतळावर सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येतात. मात्र, अनेकदा प्रवाशांची वाट पाहताना चालक आपली वाहने टर्मिनलच्या समोर बराच वेळ उभी करून ठेवतात. यामुळे तिथे मोठी गर्दी निर्माण होते आणि वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. काही वेळा हे वाहन उभे करण्याचे प्रमाण अर्धा तासापासून ते एका तासापर्यंतही असते, ज्यामुळे इतर प्रवाशांना आणि वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागतो. या परिस्थितीवर उपाय म्हणून प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे.



