
पंचनामा प्रतिनिधी – शाळा आणि शिक्षण संस्थांमधील शैक्षणिक स्पर्धेमध्ये उपक्रमांना जास्त महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शिक्षणापेक्षा उपक्रमांची गर्दी शाळांमध्ये होताना दिसते. यामध्ये समतोल ठेवण्याची आवश्यकता आहे. अशावेळी शैक्षणिक गुणवत्ता राखण्याचे मोठे आव्हान शाळा आणि शिक्षकांपुढे असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव यांनी व्यक्त केले.

जिल्हा परिषद शाळा धामणी येथील यंदाच्या शैक्षणिक वर्षातील प्रवेशोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल जाधव बोलत होते. जिल्हा परिषद शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून, रांगोळी आणि पुष्पवृष्टी करून वाजत गाजत आनंदाने स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच प्रतीक्षा जाधव होत्या.

पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या शाळा आता अधिक स्मार्ट होत आहेत. उपक्रम आणि गुणवत्ता, नवनवीन शैक्षणिक सुविधा यामुळे खाजगी शाळांपेक्षा एक पाऊल पुढे जिल्हा परिषदेच्या शाळा जात आहेत. असे सांगून विठ्ठल जाधव म्हणाले, सध्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा दिसून येते. आणि खाजगी शाळा तसेच सरकारी शाळांमध्ये उपक्रम जास्त आणि गुणवत्तेला कुठेतरी वेळ कमी पडतो. अशावेळी उपक्रम आणि शैक्षणिक गुणवत्ता यांची योग्य पद्धतीने सांगड घालण्याची गरज आहे आणि तेच खरे शिक्षकांच्या पुढे आव्हान असल्याचे वाटते.

जिल्हा परिषद शाळेची मुले आता नासा, इस्रो सारख्या संस्थांपर्यंत झेप घेत आहेत. ए आय रोबोटिक लॅब सारखे उपक्रम जिल्हा परिषद शाळेत येत आहेत. मोफत शिक्षण देणारे या शाळा खाजगी शाळांपेक्षाही अधिक पुढे जात असल्याने गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळेतील मुलांचा पट वाढतो आहे. हे देखील उल्लेखनीय बाब आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि यंदापासून जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू झालेला सीबीएससी पॅटर्न चा अभ्यासक्रम याबद्दल शिक्षण तज्ञांमध्ये मतमतांतरे असले तरी आता हा उपक्रम सुरू झाल्याने तो स्वीकारणे अपरिहार्य आहे. आता शिक्षकांची आणि पालकांची जबाबदारी यामुळे आणखीन वाढली आहे. बदलत्या शैक्षणिक वातावरणात त्यांना जमवून घ्यावे लागेल.

पंचायत समिती सदस्य अंकिता वाळूज यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या शैक्षणिक कामासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी पंचायत समिती सदस्या अंकिता वाळुंज,सरपंच प्रतीक्षा जाधव, अंकुश भूमकर यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी सरपंच प्रतिक्षा जाधव, उपसरपंच अक्षय विधाटे, माजी सरपंच सागर जाधव,मुख्याध्यापक शशिकांत थोरात, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश रोडे, भाऊ कदम,उपाध्यक्ष स्वाती सोनवणे, सदस्य दीपाली जाधव,सुहास रोडे, सुनील करंजखेले ,कविता तांबे, विनोद वायकर, भानुदास जाधव,भाऊ करंडे निलेश करंजखेले, आकाश जाधव,शांताराम जाधव,राजू विर इ उपस्थित होते




