
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यात अष्टविनायक महामार्गालगत पारगाव गावठाणाच्या अलीकडे असलेल्या घोड नदीवरील पुलाची अवस्था दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. पुलाच्या एका बाजूचे कठडे तुटल्याने येथील वाहतूक प्रवाशांसाठी धोकादायक बनली असून अपघातांची शक्यता प्रचंड वाढली आहे.
पारगाव परिसरातील नागरिकांकडून आणि स्थानिक जनप्रतिनिधींकडून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. मागील काही महिन्यांत या पुलावर घडलेल्या अपघाती घटना परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करतात.
मागील महिन्यात येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असताना ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर कठडे नसल्याने घोड नदीच्या पात्रात कोसळला असता. चालकाच्या चातुर्यामुळे आणि काही नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. त्यापूर्वी एक स्कॉर्पिओ गाडीही पुलावरून घसरून थेट नदीपात्रात कोसळली होती. या घटना पुलाचे संरक्षण कठाडे तुटल्याने झाल्या आहेत.
पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे आणि ग्रामपंचायत सदस्य काळुराम लोखंडे यांनी या गंभीर समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने कठडे बसवून पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. “वाहतूक वाढत असताना व पुलावरील कठडे ढासळलेले असताना मोठा अपघात होण्याची शक्यता टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे अपरिहार्य आहे,” असे मत ढोबळे यांनी व्यक्त केले.
स्थानिक नागरिकांचाही संयम सुटत चालला आहे. रोजचे कामधंदे, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि ऊस वाहतूक करणारी वाहने या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कठडे नसल्याने अंधारात, पावसाळ्यात किंवा वाहन घसरल्यास थेट नदीपात्रात पडण्याचा धोका संभवतो.
पारगावकरांनी एकमुखी मागणी केली आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन पुलाची आवश्यक दुरुस्ती करावी आणि वाहतूक सुरळीत व सुरक्षित करावी.

पारगाव (ता.आंबेगाव) येथील घोडनदी वरील पुलाचे कठडे तुटल्याने वाहतूक धोक्याची बनली आहे.


