
शब्दांकन – रमेश खरमाळे (मा. सैनिक, निसर्ग मित्र)
पंचनामा विशेष – आज मित्राच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्ताने भोईर पठार येथे जाण्याचा योग आला. या प्रवासातच वाटेत हिवरे बाजार हे नाव अनेकदा ऐकलेलं गाव भेटलं… आणि मनातली उत्सुकता थांबवणं अशक्य झालं. मग काय, सपत्नीक गावात फेरफटका मारत तेथील विविध प्रकल्पांना धावती भेट दिली.

गाव फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—गाव एकत्र असेल, तर विकास घडायला वेळ लागत नाही!
एकेकाळी दुष्काळाने होरपळलेलं, पाण्याअभावी त्रस्त आणि गरिबीने ग्रासलेलं हे साधं गाव… आज मात्र संपूर्ण देशासाठी आशेचा दीप बनलं आहे. जिथे कधी कोरडी जमीन होती, तिथे आज हिरवळ डोलते आहे; जिथे निराशा होती, तिथे आज आत्मविश्वास फुलतो आहे.
या परिवर्तनामागचं खरं सामर्थ्य म्हणजे गावकऱ्यांची एकजूट आणि दूरदृष्टी !!

पावसाच्या प्रत्येक थेंबाचं मोल ओळखत त्यांनी जलसंधारणाची चळवळ उभी केली. बंधारे, वृक्षारोपण आणि निसर्गाशी जपलेलं नातं—यामुळे गावाचं रूपच पालटलं. कोरड्या मातीतूनही जीवनाची हिरवी कोंबं फुटू लागली.
या यशामागे उभं असलेलं प्रेरणादायी नेतृत्व म्हणजे पोपटराव पवार. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावाने केवळ आर्थिक प्रगतीच साधली नाही, तर शिस्तबद्ध जीवनशैलीही स्वीकारली. दारूबंदी, वृक्षतोडबंदी, चराईबंदी यांसारख्या निर्णयांनी गावाला एक नवी दिशा दिली.

आज हिवरे बाजारमध्ये केवळ शेतीच बहरलेली नाही, तर माणुसकीही फुललेली आहे. “आपलं गाव – आपली जबाबदारी” ही भावना प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजलेली आहे. स्वच्छ रस्ते, हिरवीगार झाडं आणि समाधानाने उजळलेली चेहरे—हीच या गावाची खरी ओळख बनली आहे.
हिवरे बाजार आपल्याला शिकवतो की विकासासाठी मोठ्या साधनांची गरज नसते; गरज असते ती प्रामाणिक इच्छाशक्ती, एकजूट आणि योग्य दिशेची !!
हे गाव म्हणजे केवळ एक ठिकाण नाही, तर परिवर्तनाची जिवंत प्रेरणा आहे…!
✍️ रमेश खरमाळे (माजी सैनिक)


