
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील तसेच उत्तर भागातील पारगाव काठापूर जारकरवाडी नीरगुडसर आदी गावांमध्ये सुरू असलेले भारनियमन तातडीने बंद करावे. भारनियमन करावयाचे असल्यास ते रात्रीऐवजी दिवसा करावे अशी मागणी पारगावचे मा.उपसरपंच सचिन दत्तात्रय अस्वारे आणि व्यवस्थापन समिती मा.अध्यक्ष बजरंग देवडे,ग्रामपंचायत सदस्य रोहिणी देवडे व परिसरातील ग्रामस्थानी केली आहे.
ही मागणी मान्य न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सध्या आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागाबरोबरच उत्तर भागामध्ये सायंकाळी ७ ते रात्री ११ या वेळेत भारनियमन केले जाते. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी,महिला आणि व्यवसायिकाना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सायंकाळी दूध काढणे,कुट्टीने चारा तयार करणे,शेतीची कामे,महिलांची घरगुती कामे,विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी ही वेळ महत्वाची असते अशा वेळी ३-४ तास वीज नसेल तर त्याचा परिणाम दैनंदिन कामावर होत आहे.
या शिवाय ह्या परिसर मध्ये बिबट्याचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे तसेच इतर वन्य प्राण्यांचाही धोका आहे. अंधारामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे. महावितरण विभागाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन दिवसा वीज कपात करावी अशी मागणी सचिन दत्तात्रय अस्वारे (मा उपसरपंच पारगाव) यांनी केली आहे.

