
पंचनामा प्रतिनिधी – राज्यात सध्या उष्णतेचा तीव्र तडाखा कायम असून अनेक भागांत तापमान चाळिशीपार गेले आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. अकोला, अमरावती येथे ४४.२ अंश, तर वर्धा येथे ४४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली, वाशीम येथे तापमान ४३ अंशांपार गेले आहे. सोलापूर, मालेगाव, जळगाव, परभणी, छत्रपती संभाजीनगर येथेही तीव्र उष्णता कायम आहे.
उन्हाच्या झळांबरोबरच उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून सकाळपासूनच कडक ऊन जाणवत आहे.
मात्र, आजपासून (१८ एप्रिल) हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. मराठवाड्यापासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असून, महाराष्ट्र-कर्नाटक परिसरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. विशेषतः सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत विजांसह पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पावसामुळे पुढील काही दिवसांत तापमानात घट होऊन उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
