
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात असणाऱ्या विविध डोंगर रांगावर अज्ञात व्यक्तींच्या माध्यमातून सध्या मोठ्या प्रमाणात वणवे लावले जात असल्याच्या घटना समोर येत आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणात वनसंपदा,विविध पक्षी,प्राणी,औषधी वनस्पती, सरपटणारे प्राणी आगीच्या भक्षस्थानी पडत असल्याने निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. अशा आगी लावणाऱ्या लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी निसर्गप्रेमी व स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात जारकरवाडी,पोंदेवाडी,धामणी या परिसरात वणवे लागण्याचे प्रमाण अधिक आहे. रात्री उशिरा जारकरवाडीच्या ढोबळेवाडी नजीकच्या डोंगरावर काही अज्ञात व्यक्तींना आग लावली होती. वडाची झूत,दरा, बोगद्यावरील भाग, बैलगाडा शर्यत घाटावरील भाग या ठिकाणी आग लागल्याने मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी, झाडांचे अतोनात नुकसान झाले आहे.रात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत ही आग विझवण्याचे काम वन विभागाचे कर्मचारी करत होते. अशा स्वरूपाच्या आगी लावणाऱ्या व्यक्तींची नावे वन विभागाला कळवण्यात यावीत अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.






