
पंचनामा प्रतिनिधी – धामणी (ता. आंबेगाव) तालुक्याच्या पूर्व भागातील सात ते आठ गावे शेतीच्या पाण्यासाठी वंचित आहेत त्यातून मार्ग काढण्यासाठी धामणी, पहाडदरा, येथील शेतकऱ्यांनी शेतीला व पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी तीन किलोमीटर अंतरावरून स्वखर्चाने पाईपलाईन करून आणली त्याकरिता जमिनी, घरे, दाग दागिने, गहाण ठेवून यावर ग्रामीण,शहरी पतसंस्था, सहकारी व राष्ट्रीयकृत बँकांची कर्ज काढून साधारणपणे सात ते आठ कोटीची पाण्यासाठी पाईपलाईन व वीज पंपासाठी स्वखर्चाने योजना राबवली,परंतु शासनाच्या असहकार धोरणामुळे वीज पुरवठा न केल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठी आपत्ती कोसळली आहे. केलेल्या भांडवल खर्चातून एक रुपयाची आवक नाही. आणि व्याज आणि बँकांच्या हप्ते भरायचे कुठून त्यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे.
वाडीवस्त्यावर काही दिवसांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करावे लागणार आहेत. त्यामुळे धामणी आणि पहाडदरा ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी शासनाविरुद्ध उपोषणाच्या माध्यमातून हत्यार उपसले आहे.
जर वीज पुरवठा लवकर करून दिला नाही तर तालुक्याचे तहसीलदार, विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्या कार्यालय समोर उपोषण करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. व सर्व लोकप्रतिनिधींना गाव बंदी करणार आहेत.
या उपोषणामध्ये मा.पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, मा.सरपंच अंकुश भूमकर,मा.सरपंच सागर जाधव, विद्यमान सरपंच अक्षय विधाटे, मा.सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, भाऊसाहेब करंडे,पहाडदरा गावचे सरपंच मच्छिंद्र वाघ, महेश वाघ, सोपान वायकर, प्रतीक जाधव, वामन जाधव, दीपक जाधव, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला, शेतकरी वर्ग सहभागी झाले आहेत.
