पंचनामा विशेष लेख – नाते कलेचे त्या रक्ताशी!!
अष्टपैलू तमाशा कलावंत प्यारनबाई पाटणकर
अखंड महाराष्ट्रातील कलाप्रेमी रासिकजन हो… “नाते कलेचे त्या रक्तशी ” या लेखमालेचे आजचे आकर्षण…
जुनी पारंपरिक गणगवळण, खडी लावणी यात तरबेज असलेल्या संपूर्ण आयुष्य कलेच्या योगदानाला देणाऱ्या ज्येष्ठ कलावंत म्हणजे प्यारनबाई पाटणकर मु. पो. मलकापूर ता. कराड जि. सातारा होय.
त्यांच्या आईचे नाव साखराबाई पाटणकर आहे. त्यांचे आई वडील वारले असून, प्यारनबाईचे लग्नही झालेले नाही.त्यांना वयाच्या 14 व्या वर्षापासून कलेचा छंद लागलेला, जनाबाई आत्या यांच्या सोबत कला अवगत करून जनाबाईच गुरू झाल्या. प्यारेणबाई या ताल, स्वर, लय या त्रिवेणी संगमाने तयार होऊन,रसिकांच्या ओठावर आपले नाव ठेवले. नंतर त्यांनी काळू बाळु, जगताप पाटील पिंपळेकर,दत्ता महाडिक पुणेकर, सौ. मंगलाताई बनसोडे, (कलाभूषण)रघुवीर खेडकर या नामांकित तमाशा मंडळात काम करून महाराष्ट्रात नाव कमावले.प्यारनबाईच्या लावणीचा बाज म्हणजे नववारी साडी, अंग भरून चोळी, हातभार बांगड्या, केसाचा अंबाडा, नाकात नथ, कंपाळ भरून कुंकू, पायात घुंगरू हा होय. त्या स्टेजवर येताच रसिक टाळ्यांच्या गजरात व शिट्ट्यांच्या आवाजात स्वागत करत असे. प्यारनबाईच्या अदाकारीने आणि अभिनयाने रसिक घायाळ होत असे.
प्यारनबाईने जहरी प्याला, भिल्लांची टोळी, रक्तात नहाली अब्रू, उमाजी नाईक, मुंबईचा गिरणीवला ई. वगनाट्यात मेन भूमिका करून महाराष्ट्रात नाव गाजवले. कै.कांताबाई सातारकर, कै. काळू बाळु, कै. दत्ता महाडिक पुणेकर, कै. विठाबाई नारायणगावकर, कै. खंडू खेडकर, कै. निवृत्तीबुवा कुरणकर, कै.शिवराम बोरगावकर ई. महान, अजरामर कलावांता बरोबर आणि फडमालकांबरोबर
काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजते.असे त्या म्हणतात.
प्यारनबाई म्हणतात की, जुन्या तमाशाचा बाज राहिला नसून आज तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला आहे. जून्या रसिकांनी कलाकाराकडे पाठ फिरवली असून, धार्मिक,कौटुंबिक,ऐतिहासिक, सामाजिक, राजवाडी ही वगनाट्य होत नाही म्हणून जुना रसिक वर्ग नाराज आहे.हे अगदी नक्की….
प्यारनबाई चे कै. काळू बाळू तमाशा मंडळाला 35 वर्षाचे योगदान असून, काही वर्षे स्वतः प्यारनबाई कराडकर या नावाने स्वतः चा तमाशा काढला होता.प्यारनबाई म्हणतात की , मला कोणाचाही आधार नाही शेवटी मी एकटीच आहे. कला हेच माझे जीवन असून,रसिकांची मी मरेपर्यंत सेवा करील हे माझं ब्रीद आहे. सध्या माझे वय 80 वर्षाचे आहे.मी 65 वर्ष केलेल्या रसिकांच्या सेवेचा शासनाने विचार करून, छोटा मोठा गौरव करून पुरस्कार द्यावा आणि मी मारताना तरी मला मानधन मिळावे म्हणून त्या दुःखाने टाहो फोडीत आहेत.खरचं अशा महान कलवंतास शासनाने विचार करून न्याय द्यावा हीच प्यारनबाई ची अपेक्षा आहे.असे त्या डोळ्यात अश्रू आणुन, हुंदके देत सांगत होत्या…
त्यांच्या हातून रसिकांची, रांगदेवतेची सेवा घडो त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वचरणी प्रार्थना करतो.
लेखक ✍🏻
शाहीर खंदारे
ता. नेवासा
मो.8605558432