
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याची वाढलेल्या झाडेझुडपे, गवत व रानटी वनस्पतींमुळे झालेली दुरवस्था ‘पंचनामा’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर संबंधित जलसंपदा विभागाने तातडीने दखल घेत कालव्याच्या स्वच्छता व दुरुस्तीच्या कामास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
डिंभे धरणाचा उजवा कालवा हा आंबेगाव तालुक्यासह शिरूर तसेच पुढील पारनेर व नगर जिल्ह्यातील अनेक भागांतील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा जलस्रोत आहे. या कालव्याच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्र अवलंबून असून ऊस, कांदा, भाजीपाला, फळबागा तसेच विविध हंगामी पिकांना या पाण्याचा आधार मिळतो. कालव्यामुळे अनेक भागांतील शेती बागायती होण्यास मोठी मदत झाली आहे.

मात्र, काही दिवसांपासून कालव्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे, गवत व रानटी वनस्पती वाढल्याने अनेक ठिकाणी कालव्याचे पात्र झाकोळून गेले होते. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कालव्यात झुकल्या होत्या. त्यामुळे भविष्यात कालव्यातून पाणी सोडताना पाण्याच्या प्रवाहास अडथळा निर्माण होण्याची शक्यता होती. याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित विभागाने तातडीने स्वच्छता व देखभाल करावी, अशी मागणी केली होती.
यासंदर्भातील वृत्त ‘पंचनामा’ने प्रसिद्ध करून कालव्याच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल घेत जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कालव्याची पाहणी करून वाढलेली झाडेझुडपे, गवत व रानटी वनस्पती हटविण्याचे काम सुरू केले आहे. कालव्याच्या पात्रातील तसेच कडेला वाढलेली झाडेझुडपे साफ करण्यात येत असून आवश्यक त्या ठिकाणी दुरुस्तीची कामेही हाती घेण्यात आली आहेत.

पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यासाठी कालव्याची नियमित स्वच्छता व देखभाल होणे आवश्यक आहे. पाणी सोडण्यापूर्वी कालव्याची संपूर्ण पाहणी करून अडथळे दूर करण्याची कार्यवाही सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
‘पंचनामा’च्या वृत्ताची संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्याने पत्रकारितेच्या माध्यमातून मांडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. कालव्याची स्वच्छता व दुरुस्तीचे काम पूर्ण करून भविष्यातही त्याची नियमित देखभाल करावी, अशी अपेक्षा प्रगतशील शेतकरी काळूराम टाव्हरे व परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.



