
पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जारकरवाडी, लोणी, धामणी लाखणगाव, पोंदेवाडी परिसरात रविवारी मान्सून पावसाने दमदार हजेरी लावली ज्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या वर्षी २० जून उजाडली तरी या परिसरात समाधानकारक पाऊस झाला नव्हता.साहजिकच शेतकऱ्यांमधे चिंता पसरली होती.आज झालेल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
गेले अनेक दिवस पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी, सर्वसामान्य नागरिक चिंतेत होत.त्यात वाढते तापमान आणि तीव्र उकाड्यामुळे अधिक असल्याने सर्वसामान्य लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. मान्सूनच्या आगमनामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये चैतन्य पसरले आहे.
आज दिवसभर आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी चार नंतर लोणी, धामणी, जारकरवाडी, पोंदेवाडी आणि लाखणगाव परिसरात ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे बळीराजाची तारांबळ उडाली.
पहिल्याच जोरदार पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.दरम्यान, पावसाअभावी रखडलेली पेरणीपूर्व मशागतीची कामे आता वेगाने मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आशेचे भाव उमटले असून खरीप हंगामाबाबत नव्याने आशावाद निर्माण झाला आहे.






