
समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत व पाच दिवसीय इंडक्शन कार्यक्रम उत्साहात !!
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स बेल्हे येथे प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्राम व स्वागत समारोप कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवन,आधुनिक तंत्रज्ञान,व्यक्तिमत्त्व विकास,करिअरच्या संधी तसेच उद्योजकतेची दिशा मिळावी,या उद्देशाने विविध मार्गदर्शनपर व्याख्याने,स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी डॉ.पंडित शेळके-सह अधिष्ठाता,विज्ञान विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक आहे,”असे सांगितले. विद्यार्थ्यांनी अहंकार बाजूला ठेवून इतरांचे ऐकण्याची तयारी ठेवावी,सर्वांशी बरोबरीची व सहकार्याची भावना ठेवावी,तसेच आयुष्यात येणाऱ्या संकटांना न डगमगता धैर्याने सामोरे जावे,असे त्यांनी नमूद केले.सकारात्मक विचार,सातत्यपूर्ण प्रयत्न आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विद्यार्थी जीवनात निश्चितपणे यशस्वी होऊ शकतात,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी प्रास्ताविकातून समर्थ शैक्षणिक संकुलातील विविध अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेतला.आजच्या आधुनिक व स्पर्धात्मक युगात प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कौशल्यांसोबतच अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे.समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्समध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणविकासाला सदैव प्राधान्य दिले जाते.त्यामुळे विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे,तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होऊन स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करतील,असे त्यांनी सांगितले.यावेळी त्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल,पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
पाच दिवसीय इंडक्शन प्रोग्राममध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.प्रा.ज्ञानेश्वर ढोमसे यांनी ‘व्यक्तिमत्त्व विकास ही काळाची गरज’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा.संतोष गुजर यांनी सायबर सिक्युरिटी,क्लाऊड कम्प्युटिंग आणि डेटा सायन्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील संधींची माहिती देत इंटरनेट वापरातील धोके व त्यापासून संरक्षण करण्याच्या उपाययोजना स्पष्ट केल्या.प्रा.अमोल पवार यांनी आयटी क्षेत्रातील करिअरच्या संधी,आव्हाने तसेच नोकरी व व्यवसायातील बदलत्या पद्धती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ.भूषण नांद्रे यांनी विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग उभारून तो समाजासाठी उपयुक्त कसा ठरू शकतो,हे विविध उदाहरणे व छोट्या-छोट्या कृतींच्या माध्यमातून समजावून सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संगणक विभागाचे बोर्ड ऑफ स्टडीज सभासद प्रा.डॉ.विलास वाणी यांनी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमातील बदल, परीक्षा पद्धती व प्रश्नपत्रिकेचे स्वरूप याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी त्यांच्या हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
इंडक्शन कार्यक्रमा दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.पोस्टर सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी संगणक व सामाजिक विषयांवर कल्पक पोस्टर तयार केले. संगणक प्रश्नमंजुषेतून आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाविषयी विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची चाचणी घेण्यात आली. व्यावसायिक प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून युवा उद्योजकतेसाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींची माहिती देण्यात आली.तसेच निबंध लेखन स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर आपले विचार मांडले.
या विविध उपक्रमांमध्ये तब्बल २६२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार व डॉ.लक्ष्मण घोलप यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.गणेश बोरचटे,प्रा.अक्षय वाघ,प्रा.विलास गवारी,डॉ.प्रणाली साळुंखे,डॉ.उद्धव भारती तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दिनेश जाधव,जनसंपर्क अधिकारी डॉ.शरद पारखे यांनी विशेष परिश्रम घेतले.प्रा.प्राजक्ता रायकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा.दिपाली जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.



